
Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने तीन दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. फळबागा, भाजीपाला आणि अन्य पिकांचे यात नुकसान होत आहे. संगमनेर, अकोले, पारनेर, कर्जत, राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. सोमवारी (ता. १९) दुपारी जोरदार पाऊस झाला. अहिल्यानगर तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाळकी, राळेगण, देऊळगाव, रूईछत्तीसी, खडकी, गुंडेगाव, अरणगाव, मेहेकरी, भातोडी, पारगाव, पारेवाडी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी गावात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. पावसाने संगमनेर, अकोले भागात धुमाकूळ घातला. अवघ्या काही मिनिटांत पाणीच-पाणी झाले होते. बसस्थानकासमोर व नवीन नगर रोडने तर अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. पावसामुळे काही प्रमाणात फायदा जरी झाला असला, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दहा दिवसांपासून वादळ व सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये उघड्यावर साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पाथर्डीतील मिरी परिसरात अतिशय सोसाट्याचा वादळी वारा आल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही झाडांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर आडव्या पडल्यामुळे मिरी-शेवगाव रोड व मिरी-तिसगाव रोड हे दोन्ही प्रमुख मार्ग काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद झाले होते. वादळामुळे विजेच्या ताराही तुटल्याची माहिती असून काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक फळबागांचे नुकसान झाले आले.
संगमनेर तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. काही जनावरे दगावली आहेत. फळबागा व पिकांत पाणी साठून मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशा सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांत १९ ते २१ मे या कालावधीत ढगांच्या गडागडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. २२) विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा तर शुक्रवारी (ता. २३) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने पिवळा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. शेतकरी, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे प्रमुख डॉ. विरेंद्र बडधे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.