Fodder Shortage : जिल्हाबंदीच्या आदेशामुळे शेतकरी संकटात

Farmer Issue : संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाबंदीचा आदेश दिल्याने दादर, ज्वारीचा कडबा घेण्यास कोणी तयार नाही.
Fodder
FodderAgrowon

Dhule News : संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाबंदीचा आदेश दिल्याने दादर, ज्वारीचा कडबा घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे शेत-शिवारात कडबा तसेच विविध प्रकारचा चारा पडून आहे. काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्याची एकूणच हवामानाची स्थिती लक्षात घेता हा जिल्हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून सरकार दरबारी नोंद आहे. जिल्ह्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन इंग्रज सरकार काळापासून हा जिल्हा रब्बीसाठी प्रसिद्ध आहे. साक्री, शिरपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दादर व ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या खरीप हंगामात मान्सून (पाऊस) अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

Fodder
Hydrophonics Fodder : चारा टंचाईत हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा पर्याय

पीक जोमदार...

रब्बी हंगामाआधी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने ज्वारी पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली. ज्वारीसाठी यंदा अनुकूल हवामान असल्यामुळे पीक जोमदार आले होते. अपेक्षेप्रमाणे उत्पादनही यंदा चांगले निघाले. ज्वारीच्या काढणीनंतर जनावरांना सुका चारा म्हणून पशुपालक कडब्याची साठवणूक करतात. स्वतःसाठी राखून ठेवून उर्वरित कडबा विक्री केला जातो.

Fodder
Fodder Shortage : नगर जिल्ह्यात मेच्या मध्यापर्यंतच चारा उपलब्ध

जिल्हा बंदीचा आदेश

मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाने चाऱ्यासाठी जिल्हाबंदीचा आदेश लागू केल्याने कडब्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. ज्वारी काढून पेंढी बांधण्याचा खर्च पाच ते सहा रुपये असा आहे. मात्र, सध्या कडबा घेण्यासाठी कोणीही तयार होईना, असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शेत-शिवारात कडबा आहे त्या जागेत पडून आहे. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण आहे. शेतातील कडबा असे अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाराटंचाईबाबत पुन्हा एकदा सर्वेक्षण करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रशासनाच्या आदेशामुळे पाणी

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात किती चाराटंचाई आहे हे तपासून निर्णय घ्यावा. एकतर्फी आदेश लागू करू नये, असे वाटते. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच, रब्बीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर यंदाचे वर्ष काढण्याचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांवर जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पाणी फिरले आहे, अशी भावना या वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com