Alibaug News : अलिबाग-विरार कॉरिडॉरमुळे विकासाच्या अनेक संधी या भागात उपलब्ध होणार आहेत; मात्र संपादित जमिनींना कवडीमोल मोबदला देण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, या विरोधात एल्गार पुकारला आहे.
शेतकऱ्यांच्या किमती जमिनींना भूसंपादन अधिकाऱ्यांनी अत्यंत कमी भाव देऊन फसवणूक केल्याचा आरोप अलिबाग-वसई विरार कॉरिडॉरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. २२) मोर्चा काढला होता. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी अलिबाग शहर दणाणून सोडले.
अलिबाग एस. टी. थांब्याहून निघालेला मोर्चा पोलिसांनी हिराकोट तलावाजवळ अडवल्यावर आंदोलकांनी ठिय्या मारला आणि मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चात उरण व पनवेल तालुक्यातील बाधित १६ गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
मोर्चात माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार महेश नाईक, सचिव रवींद्र कासूकर, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, वसंत मोहिते, संतोष पवार आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते.
सरकारचा डाव उधळून लावणार!
जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएलसारखे प्रकल्प उरणमध्ये आहेत, तिसरी मुंबईही येथेच होऊ पाहात आहे. हाकेच्या अंतरावर विमानतळ, अटल सेतूमुळे मुंबई २० मिनिटांच्या अंतरावर आली आहे.
इतक्या महत्त्वपूर्ण ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांची जमीन विकासकामासाठी घेताना, कवडीमोल भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारचा हा डाव उधळून लावणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.