
Nanded News : राज्य शासनाने पीकविमा योजनेत केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत आठ दिवसावर आली, असताना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ एक लाख ५९ हजार २३ शेतकऱ्यांनी दोन लाख ९८ हजार ५०२ विमा अर्ज दाखल केले आहेत.
मागीलवर्षी अकरा लाख अर्ज दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. यात शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात या योजनेत सहभागी होता येत होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती.
नवीन बदलांनुसार, यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. नव्या बदलानुसार एखाद्या महसूल मंडळात नुकसान झाले तर त्याच मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत.
या बाबींमुळे उत्पादनात घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान राज्य शासनाने पीकविमा योजनेत केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परिणामी या योजनेकडे शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत एक लाख ५९ हजार १२३ शेतकऱ्यांनी दोन लाख ९८ हजार ५०२ विमा अर्ज दाखल केले आहेत.
यात शेतकऱ्यांनी एक लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पीक विमा नोंदीची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. आगामी आठ दिवसात किती शेतकरी यात सहभाग घेतील हे कळेल. मागीलवर्षी खरिपात अकरा लाख अर्ज पीकविमा योजनेत आले होते. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही वर्षांचा अनुभव बघता पीक विमा नोंदणीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते परिणामी पीक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन पोर्टल हळू होते किंवा पीक विमा भरताना अडचणी येतात. पीक विमा भरण्याची अंतिम ३१ जुलै आहे.
या मध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसांची वाट न बघता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
पीकविमा भरण्यास शुल्क देऊ नये
पीक विमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते तसेच फार्मर आयडी अनिवार्य असल्यामुळे सातबारा व होल्डींगची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकरी हिस्सा असलेल्या विमा हप्त्याव्यतिरिक्त जादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच ग्राहक सेवा केंद्रामध्ये सीएससी लॉगिन मधून पीक विमा नोंदणी करतांना अडचणी येत असल्यांस शेतकऱ्यांनी पीक विमा पोर्टलवर शेतकरी लॉगिन मधून पीकविमा नोंदणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.