Nashik News : ‘‘सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाशिवाय जल-सुरक्षित भारत निर्माण करणे शक्य नाही. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून महत्त्वपूर्ण योगदान आपण देऊ शकतो. घरगुती वापरापासून ते सार्वजनिकस्तरावर पाणीवापरात काटेकोर नियोजन आवश्यक आहे.जलस्रोतांचे संवर्धन, जलस्रोतांची वाढ व विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
‘जल समृद्ध भारता’ची संकल्पना साध्य करण्यासाठी देशभरातील संस्थांनी केलेल्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागातर्फे राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात. यंदा दिलेल्या पाचव्या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (ता. २२) राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे करण्यात आले. या वेळी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप दिसून आली आहे. सर्वोत्कृष्ट पाणी वापर महासंघ या गटात ‘पेनटाकळी प्रकल्पस्तरीय पाणी वापर महासंघ’ देशात प्रथम, तर सर्वोत्कृष्ट संस्था गटात ‘बायफ’ संस्थेस प्रथम व ‘युवा मित्र’ संस्थेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था गटात पुणे तिसऱ्या स्थानी आहे. सर्वोत्कृष्ट उद्योग गटात यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रा. लि. यास तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ९ गटांत ३८ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघ, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त), आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्थांचा समवेश होता. सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशा, द्वितीय उत्तर प्रदेश तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. पाण्याच्या महत्त्वाविषयी जनजागृतीसह सर्वोत्तम पाणी वापर पद्धतीचा अवलंब हे राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, की पृथ्वीवर गोड्या पाण्याचे स्रोत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. हे माहिती असूनही जलसंधारण आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले जाते. मानवनिर्मित कारणांमुळे ही साधने प्रदूषित आणि नष्ट होत आहेत. त्यासाठी भारत सरकारने जलसंधारण आणि जलसंचयनाला चालना देण्यासाठी पावले उचलली असल्याचे नमूद केले. जलसंधारण हा आपल्या परंपरेचा भाग आहे. आपले पूर्वज गावाजवळ तलाव बांधायचे. पाणीटंचाईच्या वेळी साठलेले पाणी वापरता यावे म्हणून ते मंदिरात किंवा जवळ जलाशय बांधत असत. दुर्दैवाने पूर्वजांचे शहाणपण आपण विसरत आहोत. काही लोकांनी वैयक्तिक फायद्यासाठी जलाशयांवर अतिक्रमण केले केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.