
Pune News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननीवरून जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे राज्यातील महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले असून आता विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याचमुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. पटोले यांनी, राज्यात ज्या लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली आला त्यांची गरज सरकारला राहिली नाही. आता सरकार ‘लाडक्या भावासाठी’ काम करणार असल्याचा हल्लाबोल केला आहे. ते विधिंमडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात ‘लाडकी बहीण’मुळेच महायुतीला यश आले आहे. ते पुन्हा सत्तेत आलेत असेच काहीसे भाजप आणि महायुतीचे नेते सांगत आहेत. पण आता निवडणुका संपल्या, निकाल आला. लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणींचा विषय आता त्यांच्यासाठी संपल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे.
सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या?, महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजप युतीचे सरकार आता ‘लाडक्या भावा’साठी काम करणारे सरकार आहे, अशी खोचक टीका देखील पटोले यांनी केली आहे.
भाजप महायुतीला पाशवी बहुमत मिळाल्याने त्यांच्यात मस्ती दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावरच चर्चा होणे अपेक्षित होती. पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते. मारकवाडीप्रमाणे इतर गावातही ग्रामसभा ठराव होत आहेत. मतदार राजा असून त्याला मताचा अधिकार आहे. तर आपले मत कुठे गेले? हे जनता विचारत आहे.
मारकडवाडीतील लोक मॉक पोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे. तो कोणीही हिरावू शकत नाही. मारकडवाडीच्या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतोय. जनभावना ओळखत नाही ही सत्तेची मस्ती असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले गेले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधान सभेचा विरोधीपक्ष नेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली आहे.
कर्नाटकात भाजपचे सरकार असतानाही बेळगावात मराठी भाषिकांवर अत्याचार झाले. तेव्हा राज्यातील भाजप गप्प होती. आता तेथे काँग्रेसचे सरकार आहे म्हणून टीका करत आहेत. पण बेळगावचा प्रश्न केंद्र सोडवू शकते. आता गेल्या १० वर्षांपासून भाजपची केंद्रात सत्ता आहे. मग निर्णय का घेत नाहीत. भाजप हा धर्माच्या नावावर मते मागून राजकारण करत असल्याची टीका देखील पटोले यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.