
Pune News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळ जवळ आठवडा संपत आला आहे. महाविकास आघाडीला ५० ही जागा मिळवता आलेल्या नाहीत. यावरून काँग्रेसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बच्चू कडू यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) खापर फोडले आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त करताना, एका रात्रीत ७ टक्क्यांहून अधिक मतदान कसे वाढले, असा सवाल उपस्थित केला आहे. तर आयोगाने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन केले आहे.
यावेळी पटोले यांनी मतांच्या टक्केवारीत तफावत असून ती गंभीर व चिंताजनक बाब असल्याचे म्हटले आहे. यावेळी पटोले यांनी, मतदाना दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले होते. तर रात्री आकरा वाजता ते ६५.०२ टक्के झाल्याचे आयोगाने जाहीर केले. ज्यात एका रात्रीत म्हणा किंवा सहा तासात मतदानात ७.८३ टक्के वाढ झाली आहे.
एका रात्रीत तब्बल ७६ लाख मतांची वाढ झाली असून हा मतदानाचा टक्का कसा वाढला? याचे उत्तर आता आयोगाने द्यावे. तर आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज देखील जाहीर करावेत, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा दावा देखील केला आहे.
पटोले यांनी मतांची आकडेवारी देताना आयोगाच्या भोंगळ कारभारावार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी, आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढली. याप्रमाणे मतदारकेंद्रावर लांबच लांब रांगा लागायला हव्या होत्या. पण अशा किती मतदार संघावर रांगा लागल्या याचाही पुरावा आयोगाने द्यावा. केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेड द्यावेत.
याआधी मतदान झाल्यानंतर आयोग पत्रकार परिषद घेऊन माहित देत असे पण आता आठवडा ओलांडत असतानाही पत्रकार परिषद का घेतली नाही? असा प्रश्न पटोले यांनी केला आहे. दरम्यान वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी शंका व्यक्त केली असून आता आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे आयोगाने आपले कर्तव्य समजून द्यावीत, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
राज्यात फक्त काँग्रेस पक्षाचाच पराभव झाला म्हणून आम्ही आयोगावर आरोप करत आहोत, असे नाही. तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा उचलत आहे. भाजप आणि आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. यामुळे आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.