
Solapur News : ‘‘पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सर्वांना सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा’’, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. ६) पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला घातले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामू उगले आणि सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि या वर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरिता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या समवेत तर वारकरी आलेच, परंतु पायी चालतही मोठ्या प्रमाणात वारकरी आले.
विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली.’’ प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले.
वारीने भागवत धर्माची पताका उंचावली
‘‘आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्यांसमवेत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही.
वारीत हरिनाम गजर करताना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे, ही आपली संस्कृती अलौकिक आहे. असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो’’, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
नाशिकच्या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून यंदा जातेगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याला मान मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर उगले दांपत्याचा सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.
निर्मल दिंडी पुरस्कार वितरण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या वेळी पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक - श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक - श्री गुरू बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांचा त्यामध्ये समावेश होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.