
Pune News : हवामान बदलाचा केवळ शेतीवरच नाही तर शेतीसंलग्न इतर व्यवसायांवरही होत आहे. भारतातील गहू आणि तादळाची उत्पादकता कमी होणार आहे. हवामानाच्या गतीने घडणाऱ्या घटनांमुळे हवामान अंदाज देणे आव्हानात्मक होत आहे. चीन आणि भारतातील २०० कोटी लोकांना पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागेल. शिवाय समुद्राचे तापमान वाढत असल्याने मासेमारीवर परिणाम होत आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितले.
हवामान बदलामुळे समुद्राचे पाणीही उष्ण होत आहे. त्यामुळे मासे समुद्र किनाऱ्यावरून आतमध्ये थंड पाण्याकडे जात आहेत. त्यामुळे किनारी भागातील मासेमारीवर परिणाम होत आहे. मासेमारी व्यवसायाला फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांची उत्पादकताही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, १९०१ ते २०१८ या काळात भारताचे सरासरी तापमान ०.७ अंशाने वाढले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, बदलत्या वातावरणाचा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम जाणवत आहे. गहू आणि तांदळाची उत्पादकता हवामान बदलामुळे ६ ते १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. तसेच बदलत्या वातावरणामुळे पश्चिमी चक्रावातांची वारंवारिता आणि क्षमता कमी होत आहे. पश्चिमी चक्रावातामुळे ईशान्य भारतात हिवाळी पाऊस आणि हिमवृष्टी होत असते, असे मोहपात्रा यांनी स्पष्ट केले. तर वातावरण बदलामुळे कोट्यवधी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितले.
भारतात २०२३०२४ मध्ये १ हजार १३९ लाख टन गहू उत्पादन झाले होते. या वर्षात जागतिक गहू उत्पादनपैकी १४ टक्के उत्पादन भारताने घेतले होते. तर तांदळाचे उत्पादन १ हजार ३७० लाख टन उत्पादन झाले होते. भारतातील १४० कोटी जनतेचे मुख्य अन्न तांदूळ आणि गहू आहे. यावरून या दोन्ही पिकांचे भारताच्या दृष्टीने महत्व आपल्या लक्षात येते. सरकारही ८० कोटी लोकांना मोफत तर एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के लोकांना कमी दरात गहू आणि तांदूळ देते.
नॅशनल इनोव्हेशन इन क्लायमेट रेजिलंट अॅग्रीकल्चर या संस्थेच्या मते, २१०० पर्यंत भारतातील गहू उत्पादकता ६ ते २५ टक्क्यांनी कमी होईल. सिंचनाखालील भाताची उत्पादकता २०२५० पर्यंत ७ टक्क्यांनी आणि २०८० पर्यंत १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. भारताची जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. देशातील ८० टक्के शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत. या शेतकऱ्यांची जमिन धारणक्षमता २ हेक्टरपेक्षा कमी आहे.
हवामान अंदाज देण्याचे आव्हान
बदलत्या हवामानामुळे वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे अचूक हवामान अंदाज देणे आव्हानात्मक ठरत आहे. कमी कालावधीत एखाद्या छोट्या भागात तीव्र हवामानाच्या घटना घडत आहेत. एखाद्या भागात अतितीव्र पावसाचा अंदाजाचे पुर्वानुमान देण्याची सत्यता कालावधी बदलत्या हवामानामुळे तीन दिवसांवरून आता एक आणि अर्ध्या दिवसांवर येत आहे. म्हणजेच या घटनांचा अंदाज तीन दिवसांपुर्वी देणे आव्हान ठरणार आहे, असे मोहपात्रा आणि रविचंद्रन यांनी सांगितले.
पाणीटंचाई भीषण होणार
पाण्याचे साठे कमी होत आहेत तर पाण्याचा वापर जास्त होत आहे. पाण्याची उपलब्धता कमी होताना दिसत आहे. भारत आणि चीनमधील २०० कोटी लोकांना पाण्याची उपलब्धता कमी होणार आहे. याचा मोठा फटका लोकांना बसेल. ही खूप गंभीर समस्या आहे. या समस्येला डोळ्यापुढे ठेऊन आपण भविष्याविषयी जागरूक असायला हवे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.