BRS Onion Rate Telangna : बीआरएसच्या तेलंगणा मॉडेलचं पितळ उघडं; नेतेच करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल?

K. Chandrasekhar Rao : शेतकऱ्यांचं हित जपणारं सरकार तेलंगणात आहे असं के.चंद्रशेखर राव ठासून सांगतायत. त्यामुळं याच तेलंगणा मॉडेलच्या भुरळ घालणाऱ्या आकर्षक घोषणांच्या जोरावर भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात मजल मारलीय.
BRS Onion Rate Telangna
BRS Onion Rate TelangnaAgrowon

BRS Party Update : सध्या राज्यात भारत राष्ट्र समिती पक्षाची म्हणजेच बीआरएसची जोरदार चर्चा सुरू आहे. बॅनरबाजी, पक्षप्रवेश सोहळे आणि शेतकऱ्यांचे कैवारी असण्याचा आव सगळं कसं जोरात सुरूय.

प्रत्येकच राजकीय पक्ष आपल्या उभ्या-आडव्या विस्तारासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळं त्यात गैर असं काहीच नाही. परंतु भारत राष्ट्र समितीच्या तेलंगणा मॉडेलची जी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यात मात्र काळंबेरं असण्याची शक्यता शेतकरीच आता व्यक्त करू लागलेत.

शेतकऱ्यांचं हित जपणारं सरकार तेलंगणात आहे असं के.चंद्रशेखर राव ठासून सांगतायत. त्यामुळं याच तेलंगणा मॉडेलच्या भुरळ घालणाऱ्या आकर्षक घोषणांच्या जोरावर भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात मजल मारलीय.

त्यामुळं तेलंगणा मॉडेलच्या २४ तास मोफत पाणी आणि वीज, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा विषयांची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. पण या नुसत्या चर्चाच आहेत की प्रत्यक्षात तसं काही घडतंय? यावर मात्र आता शंका घेतली जाऊ लागलीय.

राज्यातील बाजारात मागच्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळेत. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मातीमोल भावानं कांदा विकावा लागतोय. आधीच कांद्याचे भाव पडल्यानं त्रस्त असलेल्या कांदा उत्पादकांना मग सल्ला दिला तो बीआरएसचे राज्य समन्वयक माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज्यात कांद्याचे भाव पडलेले असतानाही तेलंगणामध्ये मात्र कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार रुपयांचा दर मिळतोय.

BRS Onion Rate Telangna
BRS Party Office: बीएसआरचं पहिलं पक्ष कार्यालय फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हैदराबाद बाजार समितीमध्ये १ हजार ८०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलनं कांदा विकलाय. म्हणून शेतकऱ्यांना चांगला भाव हवा असेल तर कांदा तेलंगणाच्या बाजार समितीत नेऊन विका असा सल्ला दिला.

बीआरएसचे राज्य समन्वयक आणि शेतकऱ्यांचे 'हितचिंतक' असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून नगर जिल्ह्यातील पुणतांब्याच्या योगेश वाणी या शेतकऱ्यानं ५०० गोणी कांदा हैद्राबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला. त्यासाठी त्यांनी तीन रुपये प्रतिकिलो वाहतूक खर्च केला.

पण तिथं गेल्यावर मात्र कांद्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर असल्याचं वाणी यांच्या लक्षात आलं. पण त्यांच्याकड काही पर्याय नव्हता. कारण वाहतूक खर्च करून झाला होता. आणि कांदा पुन्हा परत घेऊन जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. मग त्यांनी ५०० गोणी कांदा 'तेलंगणा मॉडेल'मधल्या हैदराबाद बाजार समितीत ८०० रुपये क्विंटलच्या दरात विकला.

त्यावेळी महाराष्ट्रातील बाजारात मात्र कांद्याला सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. पण वाणी यांनी हर्षवर्धन जाधवांवर विश्वास ठेवून घातच करून घेतला. त्यात ६ टक्के आडत घेण्यात आली. त्यांना सर्व खर्च जाऊन ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

वाणी यांनी बीएसआरचे राज्य समन्वयक हर्षवर्धन जाधव यांच्यावर विश्वास ठेवून कशी फसवणूक झाली, याची माहिती देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. कांदा उत्पादक शेतकरी योगेश वाणी म्हणाले, "आम्हाला राजकारण करायचे नाही;

मात्र कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. दोन पैसे मिळतील म्हणून आम्ही विश्वास ठेवला. मात्र त्यात खर्च करूनही फसलो. राजकीय नेत्यांनी खोटे आश्वासने देऊ नये तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये." त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली जाऊ लागलीय. यावर हर्षवर्धन जाधव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न अॅग्रोवननं केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हैदराबाद समिती कांदा बाजारभाव

वास्तवात मात्र तेलंगणा राज्य सरकारच्या कृषी पणन विभागाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चालू आठवड्यात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दर १ हजार ४०० मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला चालू आठवड्यात प्रतिक्विंटल सरासरी ८०० रुपयांचा दर मिळातोय.

त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी कांद्याला क्विंटलला २ हजार रुपयांचा दर मिळत असल्याच्या बाताच हाणल्याची भावना कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत. त्यामुळं 'अब की बार किसान सरकार'चा नारा देणारं तेलंगणा मॉडेलसुद्धा बीआरएसच्या नेत्यांप्रमाणं दिशाभूल करणारं आहे की काय अशी शंका शेतकरी घेऊ लागलेत.

पवारांची बीआरएसवर टीका

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यानं बीएसआरवर जोरदार टीका केलीय. पवार म्हणाले, ‘‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तेलंगणा सरकारकडून दिशाभूल केली जात आहे.

काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून हैदराबादला कांदा नेला. तेव्हा त्यांची काय फजिती झाली, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळाले. ‘बीआरएस’ राजकीयदृष्ट्या आपण वेगळे काहीतरी करत आहे, असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या पलीकडे काही नाही. ‘बीआरएस’ला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळेल की नाही, हे भविष्यात कळेल,’’ असेही पवार म्हणाले.

BRS Onion Rate Telangna
BRS Party Office: चंद्रशेखरराव यांच्या बीएसआरचं पहिलं कार्यालय नागपूरात; देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात बीएसआरची एंट्री

बीआरएसची सावरासावर

पितळ उघडं पडल्यावर बीआरएसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. बीआरएसची बदनामी करण्याचा काही पक्षांचा डाव आहे. शेतकऱ्यांचे आरोप खोडण्यासाठी हर्षवर्धन जाधव स्वत: हैदराबाद समितीत गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. खोटे व्हिडिओ बनवून राजकीय हेतूपोटी बदनामी डाव आहे, असा केविलवाणा प्रयत्न बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com