
Rice Export : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बासमती तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. भारत आणि पाकिस्तान बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक देश आहेत. दोन्ही देशातील सुगंधी बासमतीला जागतिक बाजारात मागणी असते. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र दोन्ही देशातील संबंधात तणाव वाढला आहे.
त्यामुळे मागील सहा महिन्यात सतत घसरण होत असलेल्या बासमती तांदळाच्या किंमतीत मागील दोन आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील खरेदीदारांनी भारताकडे खरेदीसाठी मोर्चा वळवला असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे.
देशांतर्गत बाजारात तांदळाच्या पुरवठ्या अभावी किंमती वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत होते. त्यामुळे केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये बासमतीवर किमान निर्यात शुल्क आकारलं. परिणामी तांदळाच्या किंमतीत घसरण झाली. त्यानंतर केंद्र सरकारने किमान निर्यात शुल्क हटवले. परंतु बासमतीची निर्यात मंदावली.
तर दुसरीकडे जागतिक बाजारात भारताची प्रतिमा बेभरवशाचा निर्यातदार देश अशी झाल्याने मध्यपूर्वेतील देशांनी तांदूळ खरेदीसाठी पाकिस्तानकडे मोर्चा वळवला. त्यामुळे देशांतर्गत तांदळाच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. या दोन्ही कारणांमुळे भारतातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
सध्या मात्र भारत-पाकमधील तणावाच्या स्थितीमुळं तांदळाचा पुरवठा कमी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी मध्यपूर्वेतील देशांसह अमेरिकनेही भारतीय तांदळाची खरेदी वाढवली आहे. त्यामुळे तांदळाची किंमतीत वाढ झाल्याचं निर्यातदार सांगत आहेत.
भारतात उकडा बासमती १५०९ सर्वाधिक वापरला जातो. ग्राहकांची या वाणाला पसंती असते. मागील दोन आठवड्यात बासमती १५०९ ची किंमत ५३ रुपये प्रतिकिलोवरून ५९ रुपयांवर पोहचली आहे. तर स्टिम्ड बासमती तांदळाची किंमत ६२ रुपये प्रतिकिलोवरून ६९ रुपयांवर पोहचली आहे. तसेच किरकोळ बाजारात सेल्ला तांदळाची किंमत प्रतिकिलो ७५ रुपये आणि उच्च प्रतिच्या बिर्याणी तांदळाची किंमत ८० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
मध्यपूर्वेतील खरेदीदार सौदी अरेबिया, इराण, येमन आदी देशांनी भारताकडून बासमती तांदळाची खरेदी सुरू केली आहे. तसेच अमेरिकन खरेदीदारही टॅरिफ लागू होण्यापूर्वी तांदळाचा साठा उचलण्यासाठी खरेदी करत आहे.
अमेरिकन खरेदीदार दरवर्षी ३ लाख टनांहून अधिकच्या बासमती तांदळाची खरेदी भारतातून करतात. अमेरिकेला तांदूळ पोहचण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे भारताकडून बासमती तांदळाच्या खरेदीवर अमेरिकन खरेदीदार भर देत आहेत.
दरम्यान, भारत जगाला ७० टक्के तांदूळ निर्यात करतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं निर्यातदार सांगत आहेत.अर्थव्यवस्थेसह व्यापार आणि देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शांतता आणि स्थिरता अन्नधान्याची किंमती स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची असल्याचं जाणकार सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.