Maharudra Mangnale : कडू काकडीचं बी का बुडवत नसतील?

Agriculture Experiences : एका शेतकऱ्याचा अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यासाठी अजिबात उपयोगाचा नसतो.शेतीत दुसऱ्या शेतकऱ्याचं अनुकरण करता येत नाही, हे माझं अनुभवसिद्ध मत आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : शारीरिक कष्ट करताना जेवढा त्रास होतो,त्यापेक्षा कितीतरी अधिक आनंद ते काम संपल्यानंतर होतो.आज माझी सकाळची स्थिती काम करण्यासारखी नव्हती. तरीही सकाळी सहा वाजता सोयाबीन गोळा करण्याचं काम सुरू करावं,असं मला वाटत होतं.

पण हडोळतीहून सहाजण येणार असल्याने,त्यांच्या सोबत दहा वाजताच काम सुरू करणं अनिता,संगीताला सोईचं वाटलं असावं.त्यामुळं मी तशी सुचना केली नाही. शेतीतील कामाचा तुमचा कितीही अनुभव असला तरी,तो फारसा उपयोगी पडत नाही.

अनपेक्षित परिस्थिती निर्माण होते आणि अनुभव मातीमोल होतो,हा माझा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळं मी प्रामाणिकपणे सांगत असतो की,शेतीतील मला काही कळत नाही. मी अडाणी शेतकरी आहे.

एका शेतकऱ्याचा अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यासाठी अजिबात उपयोगाचा नसतो.शेतीत दुसऱ्या शेतकऱ्याचं अनुकरण करता येत नाही, हे माझं अनुभवसिद्ध मत आहे. त्यामुळे आमच्या शेतीतही मी माझं डोकं फारसं लावत नाही. शेतीतले बरेच निर्णय नरेश,सविता यांच्या म्हणण्यानुसार घेतो.ते एखादा विषय मांडतात,तेव्हा त्यात मला माहित असलेले धोके,अनुभव सांगतो.

पण शेवटी निर्णयाचं स्वातंत्र्य देतो.सोयाबीन गोळा करताना सुध्दा साडी कुठं अंथरायची,हे त्यांनाच ठरवू देतो.मला काम पूर्ण कसं होईल यात रस असतो.जे प्रत्यक्ष काम करतात त्यांना अधिक कळतं,असं मला मनापासून वाटतं.

त्यामुळं आज भर ऊन्हात काम करताना, हे काम संपलं पाहिजे, हिच माझी भूमिका होती.वेळ ऊन्हाची असल्याने त्रास झाला. तो अपेक्षित होता.मात्र साडे अकरा वाजता काम संपलं तेव्हा खूष झालो...कठीण काम संपल्याचा हा आनंद खरोखरच अवर्णनीय असतो..माझी तब्येत चांगली राहण्यात या आनंदाचाही वाटा आहे.

Agriculture
Maharudra Mangnale : या खरीप हंगामातून मुक्त झालो!

दुपारपर्यंत उन्हात होतो.नंतर सावलीत.पण काम करणाऱ्यांसोबतच असतो.उन्हाचा तडाखा असा आहे की,दर अर्ध्या तासाला काम करणाऱ्यांनी पाणी पिलंच पाहिजे, असं मला वाटतं.शेवटी तब्येत नीट राहिली तरच काम होणार. मी ही भरपूर पाणी पिलं .तरीही सायंकाळी त्रास जाणवला.म्हटलं ,रात्रीच्या जेवणासोबत काकडी खाऊ.

खरं तर मला कळतयं तेव्हापासून मी कधीच काकडी खाल्ली नाही. ती पचायची नाही. खाल्ली की ढेकर यायचे...पण व्हिएतनाम ला २५ दिवस राहिलो आणि काकडीच्या प्रेमातच पडलो. दररोज विविध पदार्थात,जेवणात भरपूर काकडी.मी खाऊ लागलो आणि आश्चर्य म्हणजे ती पचूही लागली.

Agriculture
Maharudra mangnale : वेड्या बाभळीच्या शेंगांचा पायगुण!

अक्षरशः मी काकडीचा फँन बनून भारतात आलो.इथं आल्यानंतर ठरवून काकडी खाऊ लागलो...गुरूवारच्या बाजारातून काकडी येऊ लागली...पण एक काकडी गोड...दुसरी कडूझार..असा अनुभव येऊ लागला. कडू काकडी तोंडात आली की,वाईट वाटायचं.

जो कोणी काकडी विकतोय त्याला हे नक्की माहित असणार की,ही काकडी कडू आहे...तरीही ही कडू काकडी का म्हणून लोकांच्या तोंडात घालत असेल?..यामुळं लोक काकडी खाणं कमी करतील आणि अंतिमतः आपलंच नुकसान होईल, हे त्याच्या का लक्षात येत नाही...

पंचवीस दिवसांच्या आमच्या व्हिएतनाम पर्यटनात आमच्या वाट्याला एकही कडू काकडी कशी काय आली नाही?.... मला वाटतं व्हिएतनाम आणि भारतात हा मुख्य फरक आहे... खरं तर कडू काकडीचं बी कायमचं संपवणं सहज शक्य आहे पण आम्हाला कडू काकडी खाऊ घालण्यातही रस असेल तर....

काही वेळापूर्वी दोन छोट्या काकडी कौतुकाने चिरल्या...जेवणासोबत एक फोड खाल्याबरोबर ती कडूझार लागली. विचार केला माझंच तोंड कडू असेल कदाचित.. .शंका नको म्हणून नरेश आणि गबरूलाही खायला दिली...कलूझाल हाय बाबा..ही गबरूची प्रतिक्रिया. नरेशही बोलला,कडू आहे..टाकून द्या..असा अनुभव आम्हाला अनेकदा आलाय..

शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळं स्वस्तात मिळावीत, फुकटात मिळाली तर आनंदच,असं म्हणणारा मोठा वर्ग आहे.भाव पाडल्याशिवाय ते शेतमाल घेतच नाहीत.. पण मी भाव न करता,हे शेतमाल खरेदी करतो..मी योग्य किमत देऊनही माझ्या वाट्याला ही कडू काकडी का? हा मला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com