Jalgaon News : यंदा पाऊसमान बरे असल्याचे भाकीत विविध संस्थांनी केले आहे. यामुळे खरिपाची तयारीदेखील वेग घेत आहे. अशात खते, बियाण्याची मागणी येणार आहे. खतांची टंचाई जिल्ह्यात बारमाही असते. अशात खरिपात मागणी आल्यास मुबलक खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाची दमछाक होत आहे.
सध्या जिल्ह्यात दोन लाख २१ हजार टन खतसाठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. यात जिल्ह्यात गेल्या हंगामातील किंवा रब्बीमधील एक लाख ८१ हजार टन खते शिल्लक आहेत. तर ५० हजार टन खतांचा पुरवठा नव्या हंगामात झाला आहे. हा साठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
परंतु जिल्ह्यात अनेक भागांत १०.२६.२६ चा तुटवडा आहे. पोटॅश व डीएपी ही खते मुबलक आहेत. परंतु युरियादेखील पुरेसा उपलब्ध होत नाही, अशीही तक्रार शेतकऱ्यांमध्ये आहे. जूनमध्ये पाऊस आल्यानंतर अनेक शेतकरी सरळ खते पेरणी करतानाच देतात.
यामुळे या काळात खतांची मागणी सर्वत्र असणार आहे. त्यात युरिया, पोटॅश पुरेसा उपलब्ध कारावा व १०.२६.२६ खतही मुबलक प्रमाणात मोठी गावे, तालुकास्तरावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
शेतकऱ्यांनी साठा करू नये
खतांची मागणी असते. परंतु एकाच वेळी शेतकऱ्यांनी पूर्ण हंगामासाठी लागणाऱ्या सर्व खतांची खरेदी करू नये. जशी गरज असते, तशी खतांची बाजारातून खरेदी करावी. यामुळे खतपुरवठ्यासंबंधीचा ताण येणार नाही व टंचाईदेखील होणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे. परंतु कृषी विभागाने आपले पुरवठा नियोजन सांभाळावे, विक्रेत्यांना समज द्यावी व लिंकिंगची समस्या दूर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.