
Chatrapati Sambhajinagar : खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार ४१ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी ७१ हजार ५२८ क्विंटल बियाण्यांची मागणी असून ३ लाख ९१ हजार १८९ टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. त्यापैकी ३ लाख १ हजार ४६८ टन इतके आवंटन मंजूर असल्याची माहिती जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठकीत देण्यात आली.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ३०२ टन इतका साठा जिल्ह्यात शिल्लक असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच जिल्ह्यात एकूण ९५०० टन खत साठा संरक्षित ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. खतांचे वितरण पॉस मशीनद्वारे करण्यासाठी जिल्ह्यात एकूण २६२४ परवानाधारक खत विक्रेते असून महाराष्ट्र खतनियंत्रण योजनेअंतर्गत ११४७ विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्या सर्व विक्रेत्यांकडे पॉस मशीन्स आहेत. कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी अधिकारी यांनी ई- पॉस मशीनचे प्रशिक्षण घेतले आहे.
जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता. ५) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, खत, बियाणे उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
७७५१ निविष्ठा विक्रेते
जिल्ह्यात एकूण २६१२ बियाणे तर २६८० खत विक्रेते, कीटकनाशके २४५९ असे एकूण ७७५१ निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येते. तसेच निविष्ठा उत्पादक, साठवणूक केंद्र यांचीही तपासणी केली जाते.
जिल्ह्यात १० भरारी पथकेही स्थापीत
जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर एक या प्रमाणे जिल्ह्यात १० भरारी पथकेही स्थापीत करण्यात आली असून त्याद्वारे निविष्ठा गुणनियंत्रणावर संनियंत्रण ठेवण्यात येते. कपाशीचे बियाणे १५ मे नंतरच विक्री करावे, अशी सूचनाही बैठकीत देण्यात आली.सोयबीन बियाण्याची उपलब्धता २५ हजार ७९९ क्विंटल आहे. त्यात शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले बियाणे १६ हजार ७७० क्विंटल आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच ते वापरावे. शेतकऱ्यांसाठी पुरेशा व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्धतेचे कृषी विभागाने नियोजन करावे,
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
खतांची मागणी (टनांमध्ये)
यूरिया १ लाख ५० हजार ४९८
डीएपी ४६ हजार ५२५
एमओपी २६ हजार २३९
एसएसपी २८ हजार २०
पीकनिहाय प्रस्तावित पेरणीक्षेत्र (हेक्टरमध्ये)
तृणधान्य २ लाख ३३ हजार २३६
कडधान्य ५६ हजार ५३६
गळीतधान्य ४० हजार ४७२
कपाशी ३ लाख ५८ हजार ७९७
बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)
ज्वारी २७
बाजरी ३६४
मका ३३ हजार ३८४
तूर २१८२
मूग ३८६
उडिद १७६
भुईमूग २२९
सूर्यफूल ७
तीळ ३
कापूस ८९७०
सोयाबीन २५ हजार ७९९
तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री क्रमांक
जिल्हास्तरावर एक, प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे १० निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आले आहेत. १५ मे ते १५ ऑगस्ट आणि रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे कक्ष कार्यरत राहतील. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण होण्यासाठी कृषी विभागामार्फत १८०० २३३ ४००० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सअॅप क्रमांकही शंकानिरसन, तक्रारींसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.