
Pune News : नांदेड येथे रविवारी (ता.१३) जिल्हा प्रशासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एका ५३ वर्षीय महिलेचा अटॅकने मृत्यू झाला. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. संभाजीराजे छत्रपती यांनी, सरकारला पैसे द्यायचे असतील तर द्या पण राजकीय स्टंट करू नका असा निशाना साधला आहे. ते नांदेड येथील दौऱ्यावेळी बोलत होते.
राजकीय स्टंट कशाला करता?
नांदेड येथे प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्याभरातून सकाळी १० वाजल्यापासून महिलांना सक्तीने आणले गेले होते. यातच एका महिलेचा अटॅकने मृत्यू झाला. यावरून आता सरकारवर जोरदार टीका होत आहे. याच घटनेवरून संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर निशाना साधताना, तुम्ही पैसे देत असताल तर तुमचे कौतुक आहे. पण एखाद्याचा जीव जात असेल असा राजकीय स्टंट कशाला करता, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे
सरकारवर जोरदार टीका करताना, सततच्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. गेल्या महिन्यात ओला दुष्काळ पडला. त्यावेळी आम्ही पाहणी केली. त्यावेळी नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. ते मार्गी लागलेले नाहीत. तर पीक विम्याचा महत्त्वाचा प्रश्न देखील सुटला नसून शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही, असा आरोप देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
कुठलीच अंमलबजावणी नाही
संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठमोठ्या घोषणा करतं मात्र कुठलीच अंमलबजावणी करत नाही असा देखील आरोप केला आहे. नांदेड जिल्हा मराठवाड्यातला दोन नंबरचा जिल्हा अजूनही येथे सिंचनाची सोय झालेली नाही. लेंडी सारखा प्रकल्प अद्यापही अर्धवट रखडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर ते प्रामाणिकपणे सोडवा असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
२८८ जागा लढवण्याचा मानस
यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत आपला २८८ जागा लढवण्याचा मानस असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. सध्या राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती असून लोक नाराज आहेत. लोकांसमोर आम्ही परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय घेऊन जात असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच राज्यातील मराठा समाजाला दिलेले १० टक्के टिकेल का? असा प्रश्न आहे. तर आरक्षण टिकवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे असते. तर आम्ही सत्तेत आलो तर ते टिकेल असा लोकांचा विश्वास असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.