Kolhapur News : कडक उन्हाने पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. हिरण्यकेशी नदीकाठाला वरदायी ठरणाऱ्या चित्री प्रकल्पातील एकूण साठ्यातील ३३४ एमसीएफटी (दशलक्ष घनफूट) पाणी बाष्पीभवनात गेले आहे. सध्या प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा असून अगदीच काटकसर केली तर दोन आवर्तने उपलब्ध पाण्यातून होणार आहेत.
दरवर्षीच पाणीसाठ्याचे उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन पाटबंधारे खाते गृहीत धरते. यंदा हे प्रमाण वाढले आहे. यावर्षी फेब्रुवारीपासूनच सूर्य तापत आहे. मार्चपासून तर तो मोठ्या प्रमाणात आग ओकत आहे. त्यातच अजून एकही वळीव पाऊस या भागात झालेला नाही. कडक उन्हामुळे चित्री प्रकल्पातील एकूण साठ्यापैकी १५ ते १८ टक्के पाणी बाष्पीभवनातून जात असल्याचे पाटबंधारे खाते सांगते.
दरवर्षीचे हेच बाष्पीभवनचे प्रमाण १० ते १५ टक्के इतके असते. प्रकल्पाचा एकूण साठा १८८६ एमसीएफटी इतका आहे. त्यातील यंदाच्या १८ टक्केनुसार ३३४ एमसीएफटी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे सांगण्यात येते. जोपर्यंत साठा आहे तोवर बाष्पीभवन कमी होते. परंतु आवर्तनावेळी खळखळत येणाऱ्या पाण्यातून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. यंदा तर बाष्पीभवनची टक्केवारी वाढल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागाने काढला आहे.
मुळात अवकाळी पाऊस नसल्याने आणि एकही वळीव न झाल्याने चित्रीतील पाण्यावर ताण आला आहे. पाटबंधारे खाते उपसाबंदी लागू करत असली तरी त्याची कडक अंमलबजावणीची कार्यवाही मात्र वाऱ्यावरच आहे. सध्या ४२ टक्के म्हणजेच ८०२ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यातील पिण्यासाठी २०० एमसीएफटी पाणी राखीव ठेवावे लागणार असून शेतीसाठी अधिकाधिक ५०० एमसीएफटी पाणीच वापरात येणार आहे. यामुळे अगदी काटकसर करून हे पाणी वापरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जर जूनमध्ये पाऊस लांबला तर पाणीटंचाई डोके वर काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
कर्नाटकला कसे पाणी देणार
दरम्यान, कर्नाटकच्या चिक्कोडीतील लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांना भेटून दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नदीतून कर्नाटकातील गावांना पाण्याची गरज असून हुक्केरी तालुक्यातील काही गावांतील पाणीटंचाईची झळ कमी होण्यासाठी हिरण्यकेशीतून एक टीएमसी पाणी देण्याचीही मागणी केली आहे.
त्यावर संबंधित मंत्र्यांनी हिरण्यकेशीतून एक टीएमसी पाणी देण्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रकल्पात अर्धा टीएमसी पाणी शिल्लक असताना एक टीएमसी पाणी कसे देणार? असा प्रश्न उपस्थित होत असून उपलब्ध पाणीच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरणारे नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.