Nagpur News : फळांचा राजा आंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र, तो खाण्याचा मोह नागपूरकरांना आवरता घ्यावा लागणार आहे. अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे.
त्यामुळे यंदा बाजारात आंब्याची आवक कमी आहे. त्यामुळेच भाव वधारले आहेत. सध्या बैगनफल्ली आंबे किरकोळ बाजारात १६० ते १८० रुपये किलो आहे. यावर्षी ८० रुपयांच्या खाली आंब्याचे भाव येण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आंध्र प्रदेशातून येणाऱ्या आंब्यांची आवकही कळमना फळ बाजारात घटलेली आहे. सध्या रोज बैगनफल्ली आंब्यांच्या दीड ते दोन हजार क्रेट विक्रीसाठी येत आहे. गुणवत्तेनुसार भाव प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत आहेत.
सध्या केवळ बैंगनफल्ली आंब्यांची आवक होत आहे. आंध्र प्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे.
आंब्यांचा हंगाम म्हणजे सर्वांसाठीच पर्वणी असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचे हे फळ असल्याने वर्षभर लोक त्याची वाट पहात असतात. त्यातच बैगनफल्ली हा बाजारात सर्वात प्रथम दाखल होणारा आंबा. तो प्रारंभी १२० ते १५० रुपये किलो असतो. यंदा मात्र, त्यापेक्षाही भाव अधिक आहे.
त्याचे कारण अवकाळी पावसाचा फटका आंब्याच्या पिकाला बसला आहे. परिणामी आवक कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बैगनफल्ली आंब्यांसोबत इतरही आंब्यांचे भाव वाढण्याचे संकेत आहेत. यंदा बाजारात कमी प्रमाणात असल्याने ग्राहकांच्या आवाक्यात येणार की नाही अशी स्थिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.