
Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे घोणस जातीचा विषारी साप चावल्याने एका तरूण शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. शिवानंद भगवान तेली (वय २८) तरुणाचा शेतात जनावरांना चारा घालत असताना त्याला साप चावला. दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सापाने दंश केल्यानंतर शिवानंदला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची माहिती नातेवाईकांमध्ये सुरू होती. उमदीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसी यंत्रणा नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत असल्याने ग्रामस्थांकडून या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील उमदी विठ्ठलवाडी या गावात शिवानंद तेली हे एकत्र कुटुंबात राहतात. शनिवारी (ता.१२) सायंकाळी सहाच्या सुमारास शिवानंद दूध काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी जनावरांना चारा घालण्यासाठी गंजीतील कडबा काढत असताना घोणस या विषारी सापाने शिवानंदला दंश केला.
सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर शिवानंदला तातडीने उपचारासाठी उमदी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उमदी येथील खासगी दवाखान्यात दाखवण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या दवाखान्यात नेण्यात आले.
त्या ठिकाणी रात्रभर उपचार केल्यानंतर रविवारी सकाळी उपचारासाठी मिरज येथे घेऊन जाण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. नातेवाइकांनी शिवानंद यांना बेशुद्ध अवस्थेत मिरजेतील एका दवाखान्यात आणले. दरम्यान या सगळ्यात शिवानंद याच्यावर उपचार होण्यास विलंब झाला अन् तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशानंतर जर वेळेत उपचार झाला असता तर तेली कुटुंबीयांवर कदाचित ही वेळ आली नसती अशी चर्चा सुरू आहे. उमदीतील आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.