
महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Politics) मार्ग ऊसाच्या मळ्यातून जातो असं म्हणतात. एकेकाळी तर पश्चिम महाराष्ट्राच्या साखरसम्राटांच्या (Sugar Mills) इशाऱ्यावर अगदी दिल्ली देखील हादरायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. खानदेश मराठवाडा विदर्भात देखील आता ऊस पिकवू लागले आहेत. साखरेच्या सुबत्तेबरोबर या प्रदेशांच राजकीय वजन देखील वाढलेलं आहे.
या स्पर्धेत एकविभाग मात्र मागे आहे तो म्हणजे कोकण. कोकणात ऊस पिकत नाही हा गैरसमज आपल्यापैकी सगळ्यांना असतो. पण असं नाही. कोकणात ऊस पिकू शकतो आणि तो कोकणाबरोबरच संपूर्ण देशाला संपन्नतेच्या मार्गवर नेऊ शकतो. कसं ते आपण बघू..
तर उसाच्या रसात ग्लूकोज, फ्रुक्टोज आणि स्यूक्रोज अशा तीन प्रकारची साखर विरघळलेल्या स्वरुपात असते. पण उसाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार याचं प्रमाण बदलतं. घाट माथ्यावर जो ऊस होतो त्यात 12 ते 14 टक्के शर्करा असते. तर कोकणात जो ऊस पिकतो त्यातून 9 टक्के शर्करा मिळते. साहजिकच कोकणातील उसातून स्फटिकशर्करा काढणे परवडत नाही म्हणून कोकणात साखर कारखाने नाहीत आणि ऊस लागवडही केली जात नाही.
पण जर साखर मिळवण्याच्या उद्देशाने ऊसाची लागवड न करता मद्य किंवा पेट्रोल डिझेलमध्ये जे इथेनॉल वापरतात त्यासाठी याचा वापर करायचं ठरवलं तर मात्र आपण मोठ्या प्रमाणावर आपलं परकीय चलन वाचवू शकतो. पण मुद्दा आहे तो म्हणजे आपण कोकणातल्या मातीत याची लागवड करणार कशी? तर आंतरराष्ट्रीय ख्यातीेचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांनी 10 वर्षांपूर्वी याच्यावर संशोधन सुरू केलं होतं. त्यांनी कोकणात ऊसाची लागवड कशाप्रकारे करता येईल याची पद्धतीही विकसित केली होती.
त्यानुसार, एप्रिल महिन्यात गादीवाफ्यांवर उसाच्या कांड्यांचे प्रत्येकी एक डोळा असलेले तुकडे मातीत उभे लावून त्यांपासून रोपे तयार करून घ्यायची. साधारणतः 1 चौरस मीटर क्षेत्रातून 300 ते 400 रोपे मिळतील. या रोपांना पावसाळा सुरू होईपर्यंत हाताने पाणी घालून ती जगवायची. हा गादीवाफा जर घराजवळ असेल तर घरगुती सांडपाण्यावरही ही रोपे वाढविता येतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यावर रोपे गादीवाफ्यातून काढून शेतात लावायची.
दोन ओळींमधील अंतर 1 मीटर आणि एका ओळीतल्या दोन रोपांमधील अंतर 50 सेंटीमीटर इतकं ठेवावं. कोकणात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या पिकाला पाणी देण्याची अजिबात गरज नसते आणि कोकणातील हवा दमट असल्याने, पावसाळ्यानंतरही दोन महिने हा ऊस पाणी न देता शेतात ठेवता येतो.
त्याची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तोडणी केल्यास या उसाच्या खोडांमध्ये सुमारे 12 ते 15 टक्के किण्वनक्षम साखर तयार झालेली असते. जर या रसावर ताबडतोब प्रक्रिया करणे शक्य नसेल तर त्या रसाची काकवी करून ठेवावी आणि गरजेनुसार ती वापरावी.
आता ऊस हे पाण्यावर आणि रासायनिक खतांवर जगणार नगदी पीक आहे. आता पाण्याचा मुद्दा तर निकाली निघाला पण रासायनिक खतांविना उसाची लागवड कशी करावी? तर कोकणातील उसाच्या लागवडप्रणालीत पिकाच्या दोन ओळींमधील जागेत हिरवी पाने, पालापाचोळा, पिकांमधून निघणारा त्याज्य माल, भाताचा पेंढा जमिनीवर पसरून ठेवावा.
पश्चिम महाराष्ट्रातल्या बागायती भागात ज्याप्रमाणे दर 25-30 किलोमीटरवर एकेक साखरकारखाना दिसतो आणि या कारखानदारीने तिथल्या ग्रामीण भागात जशी सुबत्ता दिसते, त्याप्रमाणे कोकणात जर इंधनाचे कारखाने निघाले तर कोकणातील ग्रामीण भागातही तशीच सुबत्ता येईल आणि पेट्रोलियमची आयात तेवढ्या प्रमाणात कमी करता आली तर देशाचाही फायदा होईल यात शंका नाही.
त्यामुळे जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना कार्बनयुक्त अन्न मिळतं. हा जैविक कचरा जमिनीच्या पृष्ठभागावरच राहू द्यावा. पावसाने भिजलेला जैवभार कुजून तो जसजसा मातीत मिसळत जाईल त्यानुसार शेतात नवा जैवभार पसरीत राहावे. जैवभाराच्या या आच्छादनामुळे शेतातल्या तणांवर नियंत्रण तर मिळवता येईलच पण मातीत मिसळल्या जाणाऱ्या जैवभारामुळे जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंचही पोषण होईल आणि या सूक्ष्मजंतूंमुळे उसाचेही पोषण होईल. या पद्धतीने ऊस लागवड केल्यास फारसा खर्च न करता प्रति हेक्टर सुमारे शंभर ते दीडशे टन उसाचे उत्पन्न मिळेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.