
जळगाव ः खानदेशात मका पिकाची (Corn Crop Sowing Khandesh) लागवड यंदा ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. यातच जेथे लागवड झाली आहे, त्या तापी, गिरणा, सातपुडा नजीकच्या भागांत वन्यप्राणी पिकात उपद्रव करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान (Crop Damage) होत आहे.
वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मक्याची लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा आदी भागांत तापी, गिरणा नदीकाठी झाली आहे. तर धुळ्यातील शिरपूर तालुक्यात अधिकची लागवड आहे. शिवाय इतर भागातही कमी अधिक लागवड झाली आहे.
पीक निसवले आहे. अशातच वन क्षेत्रातील वन्यप्राणी पिकात नासधूस करीत आहेत. रोज रात्री पिकात धुमाकूळ घालत असल्याने पिकाची अतोनात हानी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सद्यःस्थितीत २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.
वन विभागाकडून कुठलाही बंदोबस्त केला जात नसल्याने नुकसानीची पातळी रोजच वाढत आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणासाठी मजूर नियुक्त करावे लागत आहेत. त्यासाठी रोज १५० ते २०० रुपये खर्च येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. वन्यप्राण्यांची हत्या केल्यास त्याबाबत वन विभाग विचारणा करतो. शेतकऱ्यांवर कारवाईचा दम भरला जातो. पण मका पिकाचे जे नुकसान होत आहे, त्याची जबाबदारी वन विभागाने घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड ठिबकच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा करून केली आहे. पिकात धुमाकूळ करताना वन्यप्राणी ठिबकचेही नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांना ठिबक दुरुस्तीसाठी देखील खर्च करावा लागतो.
याकडे प्रशासन लक्ष देत नाही. वन्यप्राण्यांमध्ये रानडुकरे, नीलगायी, गवे आदींचा समावेश आहे. त्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.