Water Crisis : सांगलीत ३४ टॅंकर सुरू
Sangli News : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाण्याची टंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २९ गावे आणि १७६ वाड्यांवर ३४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु जनावरांच्या पाण्यासाठी कोणत्याही उपयायोजना सुरू केल्या नसल्याने पशुपालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात जूनमध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये सर्व तालुक्यांत जोरदार पाऊस झाला पण पावसाची सरासरी गाठली नाही. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत १९१ मिमी म्हणजे ४७ टक्के पाऊस झाला. तीन महिन्यांचा काळ लोटला पण अद्याप दमदार पाऊस झाला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि जत या तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केल आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील २९ गावे आणि १७६ वाड्यांवर ३४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, जनावरांच्या पाण्याचे काय असा प्रश्न पशुपालक उपस्थित करू लागले आहेत. पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने टॅंकरच्या संख्येतही वाढ होणार आहे.
जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. त्यापैकी दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि जत या पाच तालुक्यांत जनावरांची संख्या ८ लाख ६७ हजार ४५९ आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.