
Water Shortage : या वर्षी मेमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढल्यावर प्रशासनाने ‘अलर्ट’ होऊन गावातील प्रस्तावांप्रमाणे सात ते आठ गावांमधील विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. याशिवाय, दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता.
सध्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने दोन गावांना टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्या चार गावांना पावसाअभावी विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा होतो, अशी माहिती स्थापत्य अभियंता संदीप सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
तालुक्यात १४४ खेडी असून दरवर्षी उन्हाळ्यात काही ठराविक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही वेळा पशुधनासाठी देखील पाणी जवळपास उपलब्ध नसते. तालुक्यातील बऱ्याच गावांना पाण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासते.
अशा गावांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवरून प्रस्ताव आल्यानंतर हे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवले जाऊन विहीर अधिग्रहण किंवा टँकरने पाणीपुरवठा अशी उपाययोजना केली जाते.
तालुक्यातील खेडीढोक व हनुमंतखेडे या दोन गावांना नैसर्गिक पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यामुळे दरवर्षी या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या दोन गावांना टॅंकरने दोन ते चार फेऱ्या करून पाणीपुरवठा करावा लागतो. जुलै महिन्यात या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या दोन्ही गावांचे टँकर बंद करण्यात आले आहेत.
तालुक्यातील खोलसर, मोहाडी, कराडी, शेळावे खुर्द, पोपट नगर व महाळपूर या सहा गावांना विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात होता. आता पोपटनगर व महाळपूर या दोन गावांमधील विहीर अधिग्रहण बंद करण्यात आले असून खोलसर, कराडी, मोहाडी व शेळावे खुर्द या चार गावांमधील विहिरी अधिग्रहित करुन त्याद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी अजून चांगला पाऊस होणे आवश्यक आहे.
बोरी धरणात अत्यल्प पाणीसाठा
तालुक्याला वरदान ठरलेल्या बोरी (तामसवाडी) धरणात सद्यःस्थितीत अत्यल्प साठा आहे. बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६३९.८० चौरस किलोमीटर असून, धरणाची पूर्ण पातळी क्षमता ४०. ३९ दशलक्ष घनमीटर आहे.
धरणातील पाणलोट क्षेत्रासह परिसरात मुसळधार पाऊस न झाल्याने मंगळवारी (ता. १८) २६२.९२ मीटर टक्केवारी शून्य अशी पाण्याची पातळी आहे. दरम्यान, तालुक्यातील टंचाईसदृश गावांचा पाणीप्रश्न दूर होण्यासाठी या वर्षीच्या पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.