
Nashik News : शासनाने नाफेडमार्फत ५० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले.
निफाड तालुक्याचे नगदी पीक टोमॅटो आहे. कांद्याचे बाजारभाव घसरल्यावर टोमॅटो आर्थिक आधार देईल, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर बाजारभावातील घसरणीने पाणी फेरले.
टोमॅटोचे भाव प्रतिकिलो तीन ते चार रुपये घसरले आहेत. टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रतिएकरी दीड ते पावणे दोन लाख इतका येत आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रतिक्रेटस सरासरी १०० रुपये दर मिळत आहे. यात तोडणी आणि वाहतूक खर्च मिळविल्यास शेतकऱ्याच्या हातात दहा ते वीस रुपये शिल्लक राहत आहेत.
शेती मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, रोपे खरेदी, लागवड, बांधणी खते, तणनाशके, पोषके, कीटनाशके यांचा खर्च मिळविल्यास शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही शिल्लक राहत नाही. यामुळे टोमॅटो शेती तोट्याची ठरत असून, शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, भाऊसाहेब तासकर, सागर गवळी, सोमनाथ तासकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी या वेळी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.