
Tomato crop : पुणेः शेतकऱ्यांना करोडपती करणाऱ्या टोमॅटोनं एकाच महिन्यात तकऱ्यांना रस्त्यावर आणलं. टोमॅटोचे भाव एकाच महिन्यात प्रतिकिलो ७० रुपयांवरून ४ रुपयांवर आला. शेतकरी पुन्हा रस्त्यावर टोमॅटो फकत आहेत. जुलै महिन्यात सरकारनं टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना स्वस्तात दिला होता. पण त्यावेळी ग्राहकांसाठी धाऊन आलेलं सरकार आता मात्र शेतकऱ्यांची सहनशीलतेचा अंत बघत आहे. शेतकरी टोमॅटोचे भाव पडल्याने संतप्त होऊन आंदोलन करत आहेत.
आता टोमॅटोचे भाव पडले यामुळे शेतकरी अडचणीत आले.जुलै महिन्यात बाजारातील आवक कमी होऊन टोमॅटोचे घाऊक भाव ६० ते ७० रुपयांवर गेले होते. किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी टोमॅटोची विक्री १५० ते २०० रुपयांनी सुरु होती. त्यावेळी टोमॅटोच्या या भावाच्या चर्चेने आसमंत दणाणून सोडला होता. टोमॅटोचे भाव वाढले म्हणजे आपली अर्थव्यवस्था कोसळते की काय? अशी शंका या चर्चेतून यायला लागली. हे संकट कसं दूर करता येईल यासाठी सरकारनं बैठकांवर बैठका घेत सर्व यंत्रणा कामाला लावली. आपलं ग्राहक प्रेम दाखवत जास्त भावात टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना स्वस्तात दिला. चक्क नेपाळहून टोमॅटोची आयातही केली. टोमॅटोचे भाव आम्ही कमी करू, असा पण सरकारने अनेक घेतला. आणि शेवटी टोमॅटो पडला.
आता टोमॅटोचे भाव ४ रुपयांपासून मिळत आहेत. एका क्रेट टोमटोला बाजारात ८० रुपयांपासून भाव मिळत आहे. एका क्रेटमध्ये सरासरी २० किलो टोमॅटो असतो. म्हणजेच किलोला ४ रुपये भाव. पण टोमॅटोचा उत्पादन खर्च १२ रुपयांपर्यंत येतो. म्हणजेच सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही. उत्पादन खर्च तर सोडा सध्या बाजारात जेवढा भाव मिळतोय तेवढा खर्च फक्त टोमॅटो बाजारात न्यायला येतोय. उत्पादन आणि तोडणीचा खर्च तर वेगळाच. म्हणजेच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांवर संकट आहे.
मग एक महिन्यापुर्वी ग्राहकांसाठी धाऊन आलेलं सरकार आता आपल्यासाठीही धाऊन येईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना आहे. कारण शेतकरी आणि ग्राहक ही सरकराची मुलं आहेत. जुलै महिन्यात सरकारनं ग्राहकांना स्वस्तात टोमॅटो दिला. त्यासाठी सरकारनं पदरचा पैसा खर्च केला. म्हणजे ग्राहक भावासाठी सरकारनं पुढाकार घेतला. आता शेतकरी भाऊ संकटात आहे. मग या परिस्थित सराकरनं शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे. कारण दोघांनाही समान न्याय पाहीजे. पण सरकार आता गांधीच्या तीन माकडांप्राणे डोळे, कान आणि तोंडावर बोट ठेऊन आहे.
पण टोमॅटोचे भाव का पडले? तर बाजारात वाढलेली आवक. टोमॅटोचे भाव जून- जुलै महिन्यात वाढल्यानंतर चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड वाढवली होती. या लागवडी आता तोडणीला आल्या. त्यातच यंदा पाऊस नसल्याने दर हंगामात होणारे नुकसान टळून माल चांगला आला. मागील काही दिवसांमध्ये ऊन चांगलंच तापलं. वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो वेळेआधीच काढणीला येत आहेत. या सर्व कारणांमुळे बाजारातील आवक वाढली. नाशिक जिल्ह्यातील माल या काळात येत असतो. तसेच दक्षिणेतील पट्ट्यातही काढणी सुरु झाली. इतर राज्यांमधील छोटेमोठ्या लागवडीही बाजारात येत आहेत. पण सध्या दिल्ली आणि गुजरात बाजारातून मागणी कमी झालेली दिसते. याचा दबाव दरावर आला. दिल्ली आणि गुजरात बाजार तीन चार दिवसात सुरळती होण्याची शक्यता आहे.
पण सध्या शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने टोमॅटो उत्पादकांना आधार द्यावा. शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेनेच लागवडी वाढवल्या होत्या. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, हा त्यांचा हक्क आहे. भाव वाढल्यावर सरकार जसं भाव पाडतं तस भाव पडल्यावर किमान उत्पादन खर्च तरी सराकरने द्यावा. सरकारच्या धोरणानुसार हाही शेतकऱ्यांचा अधिकार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.