
Palghar News : आठवडाभरापासून कडक ऊन पडत असल्याने विक्रमगड परिसरात ऑक्टोबर हिटसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘श्रावणात रिमझिम बरसणारा पाऊस गेला कुठे’, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून कडक ऊन पडत असून पावसाने पाठच फिरविली आहे. कडक उन्हामुळे पिकालाही हानी पोहचण्यास सुरुवात झाली आहे. जे काही शेतात पावसाचे पाणी टिकून होते, ते कडक उन्हाने आटून गेले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भात रोपे पाण्याअभावी सुकून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने कडक ऊन पडत आहे.
शेतकरीवर्ग चिंताग्रस्त
शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांत पाण्याअभावी भेगा पडायला लागल्या आहेत, तर काही ठिकाणी भात रोपे सुकू लागली आहेत. अशीच परिस्थिती चार ते पाच दिवस राहिल्यास भात पिकाची रोपे पाण्याअभावी सुकून जाण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
भाज्यांचे दर वधारले
श्रावण महिन्यात साहजिकच शाकाहाराला ग्रामीण भागात महत्त्व देण्यात येते. ग्रामीण भागात पौष्टिक रानभाज्यांची मेजवानी मिळत असली तरी नेहमीच्या बाजारी भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडी, फ्लॉवर, शेवगा शेंग, शिमला मिरची प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दराने विकली जात आहे. मात्र २६० प्रतिकिलो दराने असणारे चिकन आता १६० ते २०० रुपयांवर आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.