
कऱ्हाड, जि. सातारा ः कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर (Sugarcane Rate ) जाहीर केले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील रयत-अथनी वगळता अन्य कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. साखर कारखान्यांनी एका आठवड्यात दर जाहीर न केल्यास ऊसदर संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊसदर संघर्ष समिती स्थापन केली आहे. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेचे श्रीकांत भोसले, गिरीश देशपांडे, अधिक सावंत, अनिकेत साळुंखे, भरत चव्हाण, ज्ञानदेव पवार, सुहास शिंदे, रोहित जाधव, शिवाजी चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून दराची कोंडी फोडली आहे. सातारा जिल्ह्यातील केवळ रयत-अथनी शुगरने ऊसदर जाहीर केला आहे. उर्वरित साखर कारखानदार मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनी या आठवड्यात उसाचे दर जाहीर करून साखर कारखाने सुरु करावेत. अन्यथा ऊसदर संघर्ष समिती आंदोलन सुरु करेल.’’
विश्वास जाधव म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांपासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. खतांच्या किमती वाढल्या आहेत. मजुरांची मजुरी वाढली आहे. मात्र ऊसदर त्या पटीत वाढत नाहीत. दरवर्षी ऊसदर कमी होऊ लागले आहेत. साखर कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीतून उत्पन्न मिळते. तरीही दर दिले जात नाहीत. दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.