
Akola News : जूनच्या सुरुवातीला लागवड झालेल्या कपाशीच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. जळगाव जिल्ह्यात कपाशीच्या पिकावर अशा प्रकारचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आल्याने याही भागात कापूस पट्ट्यात बोंड अळीची शक्यता वर्तवली जात आहे.
या हंगामात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची लागवड केलेली आहे. कपाशीवर लागवडीनंतर ४५ दिवसांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. हे पीक बहुतांश ठिकाणी फूल, पात्यांच्या अवस्थेत पोहोचले आहे. प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, अकोट तसेच बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्यात प्री-मॉन्सून कपाशीची लागवड झालेली आहे.
या पिकावर आता बोंड अळीची शक्यता आहे. मागील दोन-तीन हंगामांत या अळीचा उपद्रप कमी झाला होता. यंदा सतत ढगाळ वातावरण असल्याने किडीला पोषक परिस्थिती बनलेली आहे. त्यामुळे बोंड अळीची शक्यता वाढल्याचे सांगितले जाते.
कृषी विभागाने क्रॉपसॅपअंतर्गत कार्यशाळा घेत अधिकारी तसेच सर्वेक्षकांना सतर्क राहण्याचे यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. या हंगामात बुलडाणा जिल्ह्यात कपाशीची सरासरी १ लाख ८३५५८ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ९४६९३ हेक्टरवर, तर अकोल्यात १ लाख ५३ हजार६३६ हेक्टरच्या तुलनेत १ लाख २८ हजार ५७१ आणि वाशीम जिल्ह्यात २३ हजार ९१३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक यंदा लागवड आहे. यात मोठ्या प्रमाणात सिंचनावर आधारित कपाशीची लागवड आहे. या लागवडीला दोन महिने लोटले आहेत. कपाशी पिकावर साधारणपणे ४५ दिवसांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते. सुरुवातीलाच नियंत्रण मिळवले तर प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. मागील काही वर्षांत सातत्याने जनजागृती झाल्याने बोंड अळी फोफावलेली नव्हती. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच सतर्कता पाळली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.