
Washim News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नाही, असा इशारा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला आहे.
नीलगायी, हरीण आणि रानडुकरांचे मोठे कळप शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके फस्त करून मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान होत असून याकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी इंगोले यांच्यासह उपवनसंरक्षक कार्यालयाला सोमवारी (ता.७) अचानक भेट दिली.
अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबत काहीही केले जात नसल्याने संताप व्यक्त केला. लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून पीक नुकसानीची भरपाई देण्यासह या वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन २५ वर्षे झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत जिल्ह्यात रेस्क्यू टीम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत व जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठपुरावा न केल्यास पालकमंत्र्यांना झेंडा फडकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.