
Pune News : द्राक्षशेतीच्या समस्यांसाठी पुढील महिन्यात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक बोलावली जाईल. केंद्राशी संबंधित प्रश्न घेऊन माझे प्रधान सचिव दिल्लीत जातील. तसेच, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धोरणात्मक प्रश्न मांडण्यासाठी मी स्वतः दिल्लीत जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आयोजित केलेल्या द्राक्ष परिषदेला सोमवारी (ता. २८) दुसऱ्या दिवशीच्या मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कोषाध्यक्ष सुनील पवार, संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे व इतर मान्यवर व्यासपीठावर होते.
आपल्या शैलीदार भाषणातून उपमुख्यमंत्र्यांनी परिषदेत रंगत भरली तसेच द्राक्षशेतीमधील समस्यांचा आढावा घेतला. समस्या निकालात काढण्यासाठी आपल्या दोन्ही सचिवांना द्राक्ष बागाईतदार संघाशी बोलून टिपण तयार करण्याच्या सूचना दिल्या.
श्री. पवार म्हणाले, ‘‘द्राक्षशेतीमधील शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील आहेत. त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. केंद्राच्या संस्थांवर करोडो रुपये खर्च होतात. विद्यापीठे, शास्त्रज्ञ त्यांच्या पातळीवर कामे करीत आहेत. मात्र, विद्यापीठांपेक्षाही माझे अनेक शेतकरी उत्तम काम शेतीत करीत आहेत. द्राक्ष संघदेखील ६३ वर्षांपासून एकोप्याने अप्रतिम कामकाज करीत आहे.
मी उपमुख्यमंत्री असलो तरी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मला शेतीचे प्रश्न सोडवायला आवडतात. उसाचे प्रश्न मी लवकर सोडवतो असे मनात आणू नका. द्राक्ष उत्पादक हा सर्वात जास्त कष्ट घेणारा शेतकरी आहे. नैसर्गिक आपत्तीत त्याची बाग क्षणात उद्धवस्त होते. त्याला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत झगडावे लागते. त्याची मला जाण आहे.’’
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत मी राज्याशी संबंधित बहुतेक प्रश्न त्वरित मार्गे लावेल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या द्राक्ष परिषदेतील मंथन सरकार मार्गदर्शक ठरेल. कष्टकरी शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे; मात्र अव्वाच्या सव्वा मागणी केल्यास मदत केली जाणार नाही, हे सांगणारी कणखर भूमिकादेखील मी घेईन.’’
या वेळी राज्यातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अमोल भिमराव पवार, विजय शंकर देसाई, शशिंद्र बाळकृष्ण पोतदार, हनुमंत दादू माळी, सर्जेराव सिद्धू नरोटे यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...
- ‘आदरणीय शरद पवार साहेब’ यांनी द्राक्षशेतीला नेहमीच मदत केली आहे. वडीलधाऱ्यांनी सुरू केलेल्या या द्राक्षसंघाने समृद्धी आणली. राज्य शासनदेखील संघासोबत आहे.
- वाइन विक्री दुकानांना मान्यता देण्यामागे शेतकऱ्यांना मदतीचा हेतू होता. मात्र, वाइन म्हणजे दारू असा चुकीचा अर्थ लावल्याने विरोध झाला.
- राज्यात काही जिल्ह्यांत खरिपावर संकट. पण, अशी संकटे राज्याला नवी नाही. आम्ही संकटावर मात करू.
- एनएचबीचे तीन हजार कोटींच्या अनुदानापैकी निम्मे परत गेल्याचे सांगितले गेले आहे. मी याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करेल.
- बेदाण्याला जीएसटीतून वगळणे, बेदाणा चाळीला अनुदान या बाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल.
- शेतीला वेळेत पाणी, तसेच सोलर ऊर्जा पंप पुरवठा, केळीप्रमाणे द्राक्षासाठी वॅगन या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल.
- ४५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग आता एका कंपनीने ३५ हजार कोटीला मागितला आहे. मात्र, शासनाने त्यास होकार दिलेला नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.