
Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड केली जाते. परंतु यंदा तीन महिने पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या सोयाबीन क्षेत्रात १८ हजार ५५८ हेक्टरने म्हणजे ४३ टक्क्यांनी क्षेत्रात घट झाली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४३ हजार ०९६ हेक्टर आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांत आगाप सोयाबीन पेरणी केली जाते. गेल्यावर्षी उन्हाळी आणि मॉन्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला होता. त्यामुळे आगाप पेरणी केलेल्या सोयाबीन पिकांचा याचा पावसाचा फायदा झाला.
गेल्यावर्षी जिल्ह्यात ४२ हजार ८३१ हेक्टवर सोयाबीनचा पेरा झाला होता. सर्वाधिक पेरा वाळवा तालुक्यात झाला होता. त्याचबरोबर सहा तालुक्यांतही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली होती. जत तालुक्यातही सोयाबीनची लागवड झाली होती. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पिकेही चांगली वाढून अपेक्षित उत्पादनही मिळाले होते.
यंदाच्या हंगामातही सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४३ हजार ०९४ हेक्टर होते. यंदा उन्हाळी पाऊस झालाच नाही. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत घट झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांनी आगाप सोयाबीनची लागवड करण्यास प्राधान्य दिले नाही. त्यानंतर मॉन्सून पाऊस वेळेत सुरू झाला नाही.
त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला होता. परंतु जून कोरडा गेला. जुलैमध्ये १५ ते २० दिवस पाऊस झाला. या पावसावर सोयाबीनची पेरणी केली आहे. यंदाच्या हंगामात २४ हजार २७३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली.
वास्तविक, यंदाच्या हंगामात सात तालुक्यांत सोयाबीन क्षेत्रात घट झाली आहे. यंदा जत, आटपाडीत सोयाबीनचा पेरा झालाच नाही. तर कवठे महांकाळमध्ये ६ हेक्टरवर पेरणी झाली. पावसाचा खंड असल्याने सोयाबीनची पुरेशी वाढ झाली नसून शेतकरी विहीर, कूपनलिकांचे पाणी देऊन पीक जोपासणी करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.