
लोणी काळभोर, जि. पुणे ः पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या पेरण्यांसाठी (Kharif Sowing) पुरेसा पाऊस (Insufficient Rainfall) पडला नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या या पावसाअभावी लांबणीवर पडल्या आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
मागील काही दिवसांपासून हवामान खाते सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, पाऊस तर आलाच नाही. परंतु कडक ऊन व दमट वातावरणामुळे पीक परिस्थिती बिकट झाली आहे. इंधनाची दरवाढ झाल्याने यांत्रिकी मशागतीला अधिक खर्च, शिवाय खते व बियाण्यांचे वाढत्या भावामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी पैशांची साथ करून तर काहींनी कसाबसा पैसा उपलब्ध करून पेरणीसाठी कंबर कसली होती.
जिल्ह्यात पाऊस लांबला असल्याने, अद्याप पुरेशा प्रमाणात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही भागात जून महिन्याच्या मध्यात एक पाऊस झाला. खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.
दरम्यान, पेरणीयोग्य जोरदार पाऊस पडल्यानंतरच पेरण्या करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे. दुबार पेरण्यांचे संकट टाळण्यासाठी शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, पाऊस सातत्याने शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. यंदा चांगल्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असले तरी पावसाचे सातत्य व सर्वच भागांत सारख्या उपस्थितीचा अभाव शेतकऱ्यांची चिंता वाढवताना दिसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.