
Sharad Pawar Reaction On Ajit Pawar : अजित पवार यांनी केलेल्या बंडाळीला आपला विरोध असल्याचे निःसंदिग्ध शब्दांत स्पष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरण्याचे रणशिंग फुंकले आहे.
अजित पवार यांनी केलेले बंड हा शरद पवार यांना धक्का आहे की त्यांचा या सगळ्या राजकीय नाट्याला आशीर्वाद आहे, या संभ्रमावर त्यामुळे सध्या तरी पडदा पडला आहे. भाजपच्या विरोधात राज्यात आणि देशपातळीवर आपण संघर्ष करू, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ आमदारांंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव सुनील तटकरे यांनीही अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
‘‘अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याची घेतलेली भूमिका आपल्याला मान्य नाही. आपल्याला अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. परंतु त्यापैकी अनेक आमदारांनी आपल्याशी संपर्क साधून अजित पवार यांच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे सांगितले आहे. या आमदारांनी जनतेमध्ये जाहीरपणे आपली भूमिका मांडावी. येत्या दोन-चार दिवसांत अजित पवारांच्या मागे किती आमदार आहेत, हे कळेल,'' असे पवार म्हणाले.
पक्षाच्या भवितव्याबद्दल आपल्याला चिंता वाटत नाही, असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मला काही हा प्रकार नवीन नाही. १९८० मध्ये मी विरोधी पक्षनेता होता. मी ५८ आमदारांचा नेता होता. परंतु त्यावेळी पक्ष फुटला आणि ५२ जण सोडून गेले. माझ्यासह केवळ सहा जण उरले. परंतु मी पुन्हा पक्ष बांधायला बाहेर पडलो. लोकांमध्ये गेलो. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आमचे ६९ आमदार निवडून आले. जे फुटले होते त्यापैकी तीन-चार जण सोडले तर सगळे पडले. आताही तसेच होईल. उद्यापासूनच मी पक्षबांधणीसाठी बाहेर पडणार आहे.''
कराड येथे उद्या (ता. ३) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्यात आणि देशात लोकांशी संपर्क साधण्याची मोहीम सुरू करणार आहे, असे पवार म्हणाले. लोकांमध्ये जाऊन पक्षाची विचारसरणी आणि भूमिका मांडणार आहे. जनतेच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा पक्षाची नव्याने बांधणी करणे हाच एककलमी कार्यक्रम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक फोन करत आहेत, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी अबाधित राहील तर देशात विरोधी पक्षांचे ऐक्य करून भाजपविरोधात आघाडी उभी करण्यासाठी अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आपण पक्षाचे अध्यक्ष या नात्याने महासचिव पदावर नेमले होते. त्यांनी आता पक्षाच्या धोरणांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून याची जबाबदारी घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू, असे पवार म्हणाले. तसेच अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.