
अलिबाग ः नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मंदोस चक्रीवादळ (Mandous Cyclone) तयार झाल्याने समुद्र खवळणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये येत्या पाच दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (Rain Forecast) भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. किनारी राहणाऱ्या नागरिकांसह, मच्छीमारांना तसेच जिल्ह्यातील शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा धोका असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेकजण उबदार कपड्यांचा वापर करण्यावर भर देत आहेत. मात्र हवामान विभागाच्या सूचनेनुसार, रायगड जिल्ह्यामध्ये ऐन थंडीत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी वारे व मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, फळे, भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षीत ठेवण करावी. रचून ठेवलेली भाताची उडवींचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
संपर्क साधण्याचे आवाहन
शासकीय यंत्रणांसह नागरिकांनी सतर्क राहावे, आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७, २२२११८, ८२७५१५२३६३ व ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याच आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.