
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठी (Sugarcane Rate) पहिली उचल २५०० रुपये देण्याच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीने (Usdar Sangharsh Samite) आंदोलनाची तीव्रता वाढविल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी सोमवारी (ता. ३१) जिल्ह्यातील साखर कारखानदार, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावली. पण विठ्ठल, पांडुरंग आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (Vitthalrao Shinde Sugar Mill) वगळता २५०० रुपयांच्यावर पहिली उचल देण्यास बहुतांश साखर कारखान्यांनी असमर्थता दाखवल्याने कोणत्याही निर्णयाविना ही बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, या बैठकीनंतर ऊसदर संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जनशक्ती आणि बळीराजा शेतकरी संघटना यासारख्या विविध शेतकरी संघटनांनी ऊसदराच्या प्रश्नावर एकत्र येत, ऊसदर संघर्ष समिती स्थापली आहे. या समितीने गेल्या आठवड्यात ऊस परिषद घेत उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम ऊसदर ३१००० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करायचे नाहीत, असा इशारा दिला आहे. दिवाळीमुळे आधी गांधीगिरी करत ऊसवाहतूक रोखण्यात आली.
पण गेल्या दोन-तीन दिवसांत ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरचे टायर फोडणे, उसाचे ट्रॅक्टर रोखून धरणे, यासारख्या आंदोलनासह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्याशिवाय रास्ता-रोको आणि काही कारखान्याचे गेटबंद आंदोलन करून वातावरण चांगलचे तापवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वातावरण चिघळू नये, यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ही बैठक बोलावली. साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
या बैठकीला जिल्ह्यातील बहुतेक सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, माऊली हळणवर, विजय रणदिवे, सचिन पाटील, संजय कोकाटे, अतुल खुपसे, विश्रांती भुसनर, तानाजी बागल हे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीची चर्चाच पहिल्या उचलीच्या रकमेवरुन सुरू झाली. त्यावेळी पंढरपूरच्या विठ्ठल, माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे आणि श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्यांनी त्यासाठी काहीशी तयारी दाखवली. पण अन्य बहुतांश कारखानदारांनी हे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. त्यात पहिल्या उचलीवरच गाडी अडल्याने पुढे कोणतीच चर्चा होऊ शकली नाही. कारखानदार आपल्या मुद्द्यावर आणि शेतकरी संघटना २५०० रुपयांच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने, शेवटी ही बैठक कोणत्याही निर्णयाविना निष्फळ ठरली.
आरटीओ कार्यालयात कार्यकर्त्यांनी कोंडून घेतले
या बैठकीनंतर आठ ते दहा कार्यकर्त्यांसह थेट आरटीओ कार्यालय गाठत ऊसवाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी करत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. त्यावेळी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन आणि कार्यकर्त्यात बोलणी सुरू होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.