
Satara News : माण, फलटण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली आहे. दहिवडीसह माण तालुक्याच्या पश्चिम भागाला सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडाखा बसला. यात विजेचे खांब व अनेक झाडे उन्मळून पडली. आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. यासोबतच मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला तर बंधारे भरभरून वाहिले.
माण तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. ४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुटला. सत्रेवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला. सर्वच बंधारे भरून वाहिले.
या अचानक आलेल्या पुरामुळे छोटे पूल पाण्याखाली गेल्याने काहीवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काहींच्या फांद्या तुटल्या, तसेच विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
बिजवडी येथील प्रशांत वीरकर यांच्या साडेतीनशे होऊन अधिक आंब्याच्या झाडांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला असून, आंबा फळांचे साडेतीन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
फलटण तालुक्यातील तिरकवाडी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्यातील औंध परिसरात सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
वादळी वाऱ्यामुळे घरावरील तसेच पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. इतर तालुक्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.