
माणिकराव खुळे
Rain Update : यंदा देशात सरासरी इतका पाऊस आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जून महिन्यात कमी पाऊस आणि अधिक उष्णता आहे. मॉन्सूनचे आगमनही उशिराच आहे. असा सर्वसाधारण अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मॉन्सून अजून अंदमानातच खिळलेला दिसतो आहे. त्याच्या मार्गक्रमणाचा वेग जसा अपेक्षित होता तसा जाणवत नाही. या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने खरीप हंगामाचे नियोजन करावे लागणार आहे.
१) राज्यात कपाशी, तूर, सोयाबीन, मका, भाजीपाला, कांदा, भुईमूग आणि इतर कडधान्य पिके खरिपात घेतली जातात. सध्याच्या अवस्थेत मॉन्सूनचे आगमन आणि एकंदरीत परिस्थिती पाहता, खरीप पेरण्या उशिरा होवू शकतात. त्यामुळे पारंपारिक पिकांच्या ऐवजी कमी कालावधीची आणि कमी पाण्यामध्ये पिकांचे नियोजन आवश्यक झाले आहे.
२) दमट पण कमी पाऊस अशा वातावरणात टोमॅटो, कोथिंबीर, गाजर, वाल लागवड करावी. परंतु यासाठी बाजारपेठेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कमी पावसाची शक्यता, पूर्वीचा आणि सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा याची सांगड बांधताना तुषार सिंचनाची गरज नक्कीच भासणार आहे. त्याचा अधिक वापर करावा लागेल.
३) बागायती कपाशी लागवड करताना पाणी नियोजन महत्त्वाचे आहे. जिरायती कपाशी पिकासाठी मात्र चांगल्या ओलीची खात्री झाल्याशिवाय लागवड करता येणार नाही. नाही तर गुंतवणूक धोक्याची ठरु शकते.
४) मका पिकाचा विचार करताना असे वाटते की, प्रकाश संश्लेषणास कितीही सूर्यप्रकाश मिळाला किंवा सांद्रीभवनात रूपांतरित न होणारी अशी कमी दवांक तापमानाची कितीही आर्द्रता वातावरणात उपलब्ध असली तरी अशा वातावरणात दमटपणातून कीड,रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यंदा चांगला पाऊस झाल्याशिवाय मका लागवडीचा विचार करू नये.
५) जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय सोयाबीन पेरणी करू नये. एल निनो वर्षात धूळ, कमी ओलीवर, दुबार किंवा उशिरा अशा सर्व पेरण्या घातक ठरु शकतात.
६) शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या लाभक्षेत्रात पाटपाणी आवर्तन येऊ शकते की नाही त्याचा विचार करूनच खरीप पिकांचे नियोजन करावे, ऊस, फळबागेसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे.
७) रब्बी हंगामाची शक्यता एल निनो वर्षात कमी किंवा जेमतेम असण्याची शक्यता अधिक असते. यावर्षी एल निनोच्या विकसनाची शक्यता ही जून ते सप्टेंबर महिन्यातील हंगामाच्या उत्तरार्धात अधिक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रब्बीतही गुंतवणुकीची सावध पावले टाकावी लागणार, असे दिसते.
८) एल निनोच्या वर्षात चांगली ओल उपलब्ध नाही, पाऊसमान परिस्थिती पाहून जमिनीला पीकाविना शक्य झाल्यास परिस्थितीचा अंदाज घेऊन विश्रांती देण्याचा प्रयत्न का करू नये? शेतजमीन क्षारपड, गाळ आणि ओलावामुक्त, तणमुक्त व विश्रांतीसाठी एल निनोच्या निमित्ताने निसर्ग संधी देत आहे असाच सकारात्मक विचार शेतकऱ्यांनी करावा, असे वाटते.
(लेखक भारतीय हवामान खात्यामधील ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ आहेत)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.