
Unseasonal Rain मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा (Crop Damage Survey) करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची व नुकसानग्रस्तांना एकरी दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी भारत राष्ट्र समितीच्या वतीने प्रवीण जेठेवाड यांनी केली आहे.
या संदर्भात श्री. जेठेवाड यांनी विभागीय आयुक्त व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले, की मराठवाड्यामध्ये २२ ते ३० एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
गारपिटीमुळे व वादळामुळे वीज पडून नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगरमधील सर्व तालुके व गावांतील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तीळ, ज्वारी, मूग, भुईमूग, सूर्यफूल, गहू, आंबा, हळद, पपई, केळी, ऊस, पेरू, टरबूज, खरबूज, ड्रॅगन फ्रूट, जांभूळ इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.
याशिवाय गारपिटीमुळे व वीज पडून दुभती जनावरे सुद्धा दगावलेली आहेत. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यामध्येसुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. परंतु तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रति एकरी १० हजार तत्काळ निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला आहे.
याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रति एकरी १० हजार नुकसान भरपाई तत्काळ द्यावी व पिकाच्या नुकसान भरपाईसाठी उच्चस्तरीय समिती नेमून झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यावा व शिल्लक रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय समिती स्थापन न केल्यास व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई न दिल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही श्री. जेठेवाड यांनी भारत राष्ट्र समितीच्या वतीने मुख्यमंत्री व विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.