
Baramati News : दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही ना काही कारणांमुळे ऊस जळण्याच्या घटना घडतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या जळालेल्या उसाची एकरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे.
पाऊस न झाल्याने आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे जळून गेलेल्या उसाचे त्वरित पंचनामे करून प्रतिएकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे. या संदर्भातील निवेदन बारामती, इंदापूरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे शेतकऱ्यांकडून देण्यात आले.
माळेगाव, सोमेश्वर आणि भवानीनगर या साखर कारखान्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे ३० ते ३५ टक्के क्षेत्र पाण्याअभावी पूर्ण जळून गेले आहे. सोसायटी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांवर फार मोठे संकट उभे राहिले आहे.
तरी संबंधित विभागामार्फत त्वरित पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये जळालेल्या उसाची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन नावडकर यांनी दिले. कष्टकरी शेतकरी संघटनेच्या अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विक्रम कोकरे, अमित जगताप, विजय देवकाते, पोपट निगडे आणि अजय देवकाते यांनी हे निवेदन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.