
Ratnagiri News : मुसळधार पावसाचा जोर ओसरला असून, भातलावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार हेक्टरपैकी ५४ हजार हेक्टरवरील भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत.
उर्वरित लावण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सर्वसाधारण भातलावणीची कामे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होतात; मात्र लांबलेल्या पावसामुळे १५ दिवस उशीर झाला आहे.
जूनच्या सुरुवातीला मोसमी पावसाने दडी मारली होती. परिणामी, भातशेतीची कामे सुरू करण्यासाठी विलंब झाला. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाल्यानंतर पेरण्या केल्या गेल्या. कमी कालावधीत रोपे उगवून आल्यानंतर १५ दिवसांत लावणीची कामे सुरू झाली. पहिल्या पंधरवड्यानंतर मुसळधार पावसामुळे कामात व्यत्यय येत होता.
परिणामी, लावणीची कामे थांबली. पावसाचा जोर पाहूनच नांगरणी करावी लागत होती. याचा परिणाम भातशेतीचे वेळापत्रक बिघडले. शंभर टक्के लावण्या पूर्ण होण्यासाठी ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला. जिल्ह्यात भाताचे ६८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर लावणी झाल्या.
संगमेश्वरमध्ये १०० टक्के भातलावण्या झाल्या. तेथे ११ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर भातरोपे लावण्यात आली. सर्वांत कमी क्षेत्र खेडमध्ये आहे. पावसामुळे नदीजवळील लावण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात नाचणीचे क्षेत्र १० हजार ३९८ हेक्टर आहे. त्यापैकी ६ हजार १२३ हेक्टरवर नाचणीची लावणी झालेली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.