
Pali News : जिल्ह्यात दिलासादायक पर्जन्यवृष्टी झाल्याने बळिराजा सुखावला आहे. सध्या भात रोपे तरारली असून शेतकरी भात लावणीच्या कामात गुंतले आहेत. परंतु कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शिवाय मजुरीही वाढल्याने कुटुंबातील सर्वच सदस्य तसेच शहरात गेलेले चाकरमानी खास भातलावणीसाठी गावात दाखल झाले आहेत.
भातलावणीची कामे पूर्ण कशी होणार, या चिंतेत शेतकरी अदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजुरांबाबत विचारणा करीत आहेत. मात्र अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे.
तर ज्याच्याकडे बैल जोडी नाही त्यांना दुसऱ्याच्या भरवशावर लावणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अनेकांनी आपले मित्र परिवार, आप्तस्वकीयांना भातलावणीसाठी बोलावले आहे. शहरातील राहणारे चाकरमानीही मुलाबाळांसह भातलावणीत सहभागी होताना दिसतात.
सहकुटुंब भातलावणीची मजा
शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा जणू एक स्नेह मेळावा किंवा हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत आनंद सोहळाच असतो. घरातल्या स्त्रिया सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहरी करतात. सकाळी लवकर कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक आटोपून त्यांच्या मदतीला जातात.
या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची पारंपरिक गाणी, ओव्या म्हणून भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतात,आणि कधी कधी गाण्याचीही साथ देतात. दुपारच्या जेवणानंतरही सूर्यास्तापर्यंत भातलावणी केली जाते. बच्चेकंपनी सुद्धा भात लावणीत हातभार लावताना दिसते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.