Ratnagiri News : गणेशोत्सवात पावसाने जिल्हावासीयांना दिलासा दिला आहे. दिवसभरात थांबून थांबून पडणाऱ्या सरी भातशेतीला किफायतशीर असून दाणे भरण्याच्यावेळी रोपांना पुरेसे पाणी मिळत आहे. सकाळी पाऊस, दुपारी ऊन आणि सायंकाळी पुन्हा पाऊस अशी स्थिती बऱ्याचशा महसुली मंडलांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या हळव्या बियाण्यांमध्ये दाणे भरू लागले आहेत, तर उशिराने लागवडी होणारी रोपे पसवू लागली आहेत.
यंदा हंगामामध्ये कधी पावसाची दडी तर कधी मुसळधार असा लपंडाव सुरू होता. भातलावणीच्या हंगामावेळी नेहमीप्रमाणे पावसाने दडी मारली. पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या साहाय्याने पाणी शेतकऱ्यांना शेतात आणावे लागले. शेतकऱ्यांनी कशीबशी लावणीची कामे उरकली.
काही ठिकाणी पाण्याअभावी भाताची रोपे सुकून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हार मानली नाही. लावणीची कामे उरकल्यानंतर पावसाचा जोर राहील, असा शेतकऱ्यांसह साऱ्यांचा अंदाज होता. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे साऱ्यांचा अंदाज फोल ठरला.
कमी पावसाचा भातशेतीवर परिणाम दिसू लागला होता. कातळ परिसरातील भाताची रोपे करपू लागली होती. किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या दिवसभरामध्ये काही सरी कोसळत आहेत. त्यामुळे भातशेतीला दिलासा मिळाला आहे.
बहरलेली भातशेती पसवून लोंब्या तयार होऊ लागल्या आहेत. काही भागामधील भातशेती पसवण्याच्या स्थितीत आहे. या समाधानकारक परिस्थितीने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ७.२३ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगडमध्ये १५ मिमी, दापोली १४, खेड ४, चिपळूण ०.६०, संगमेश्वर ११, रत्नागिरी ०.५०, लांजा २, राजापूरमध्ये १८ मिमी पावसाची नोंद झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.