
Amravati News : राज्य सरकारने विमा हप्ता न भरल्याने आंबिया बहराच्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त २५२४ संत्रा उत्पादकांना फळपीक विमा मिळू शकलेला नाही. दुसरीकडे सरकार विमा हप्ता भरणार नाही, तोपर्यंत परतावे मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक कोंडीत सापडले आहेत.
आंबिया बहरात जानेवारी ते मे या कालावधीत तापमान ३९.५ अंशांपेक्षा अधिक व एप्रिल, मे या कालावधीत तापमान ४५ अंशांहून अधिक राहिले. त्यामुळे संत्र्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ३ हजार ५१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी विमा परताव्यासाठी कंपनीकडे सूचना दाखल केल्या. यामध्ये १ हजार १३४ कर्जदार व २ हजार ३८१ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. ३३१८ हेक्टर संत्रा उत्पादन क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
नुकसानीमुळे विमा परताव्यासाठी विमा कंपनीकडे दावे दाखल करणाऱ्या एकूण शेतकऱ्यांपैकी २ हजार ५२४ शेतकऱ्यांचे दावे कंपनीकडून मंजूर करण्यात आले. त्यांना ८.३५ कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी प्रतिहेक्टर १२ हजार रुपये प्रिमियम भरला आहे.
मात्र राज्य सरकारने त्यांचा हिस्सा भरलेला नाही. त्यामुळे दावे मंजूर केल्यानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मिळू शकलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून संत्रा उत्पादक विमा परताव्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र राज्य सरकार विमा हप्ता भरत नाही, तोपर्यंत त्यांना परतावे मिळण्याची शक्यता नाही.
अमरावती जिल्ह्यातील संत्रा फळपीक विमा स्थिती
एकूण दावे : ३५१५
एकूण प्रिमियम : १३.९३ कोटी रुपये
मंजूर दावे : २५२४
मंजूर परतावा रक्कम : ८.३५ कोटी रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.