
Pune News : बॅंका हायटेक होत आहेत. मात्र या हायटेक बॅंकांचा शेतकऱ्यांशी संवाद कमी होत आहे. बॅंकांची भाषा शेतकऱ्यांना कधी कळालीच नाही. २० कोटी रुपयांच्या बंद पडलेल्या साखर कारखान्याला बॅंका २०० कोटींचे कर्ज देते, मात्र शेतकऱ्यांना १ लाखाचे कर्ज देताना त्याची १० लाखांची शेती गहाण ठेवून घेते हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जातून उत्पन्न सुरू झाल्यावरच कर्जवसुलीची सुविधा करण्याची गरज आहे. कृषिकर्ज पुरवठ्यात अनेक आमूलाग्र बदलाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
‘सकाळ प्रकाशन’च्या वतीने अनिल महादार यांच्या ‘कृषिकर्ज, भाषा बँकेची’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शनिवारी (ता. १५) प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गायकवाड बोलत होते. या वेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यकंट मायंदे, ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, सकाळ प्रकाशनचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर उपस्थित होते.
या वेळी डॉ. मायंदे म्हणाले, ‘‘कृषिक्षेत्रातील संशोधनातून पिकांचे उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. मात्र शेतीमालाची प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन क्षेत्रातील उद्योजकतेच्या अभावामुळे शेतमालाला दर मिळत नाहीत. यासाठी कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची गरज असून, बँकिंग क्षेत्राने शाश्वत पतपुरवठा करण्याची गरज आहे.
आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘‘ॲग्रोवन’ केवळ माहिती न देता शेतकऱ्यांना ज्ञान देत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’ वाचून शेतीमध्ये प्रगती केली आहे. त्यांनी कृतज्ञता म्हणून आपल्या घराला, शेततळ्याला, शेळी फार्मला ‘ॲग्रोवन’चे नाव दिले आहे. अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.’’
या वेळी पुस्तकाचे लेखक अनिल महादार यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विषद केली. आशुतोष रामगिर यांनी प्रास्ताविक केले. अंजली इंगवले यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.