
लातूर : विभागात यंदाच्या खरिपात सरासरीच्या १२२ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) झाली आहे. या पिकाचे ४५ ते ५० टक्के काढणीचे (Soybean Harvesting) काम पूर्ण झाले आहे. गेल्या आठवड्यात विभागातील सर्व जिल्ह्यात बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता जास्त आहे.
लातूर विभागात सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून १९ लाख ११ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून दिनांक २० ऑक्टोबरपर्यंत ९२०.२२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो २० ऑक्टोबरच्या सरासरीच्या ११७ टक्के असून वार्षिक सरासरीच्या ११३ टक्के इतका पाऊस झालेला आहे. लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली
आहे.
खरीप ज्वारी : लातूर विभागात खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून आतापर्यंत ३३७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सद्या पोटरी व कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तूर : लातूर विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजर २५३ हेक्टर असून आतापर्यंत २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७३ आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गेल्या आठवड्यात विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्हयात काही महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे.
मुग ः लातूर विभागात मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हे असून आतापर्यंत ५९५१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी ६१ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.
उडीद ः लातूर विभागात उडीदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर. असून आतापर्यंत ७५६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७६ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली
आहे.
कापूस : कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर.असून आतापर्यंत ४ लाख ०२ हजार ०६८ हेक्टर. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सद्या बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे व काही ठिकाणी पहिल्या वेचणीस सुरवात झाली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी क्षेत्रियस्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयात ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात काही महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.