
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) (Monsoon) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात (Returning Journey Of monsoon) केली आहे. मंगळवारी (ता. २०) नैर्ऋत्य राजस्थान आणि कच्छमधून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने (Weather Department) जाहीर केले आहे. यंदा दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशीराने मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे.
परतीसाठी पूरक स्थिती तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानात मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र त्यानंतरही वायव्य भारतात पावसासाठी पोषक हवामान राहिल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास सर्वसाधारण वेळेपेक्षा काहीसा लांबला. १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. मंगळवारी (ता. २०) मॉन्सूनने राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली आहे.
वायव्य भारतात केंद्रभागी हवेचा अधिक दाब असलेली, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाहेर हवा फेकणारी प्रणाली तयार झाली आहे. वातावरणातील आर्द्रता खूप कमी झाल्याने या भागात पाच दिवासांपासून कोरडे हवामान आहे. यावरून वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेल्या मॉन्सून २५ ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. गेल्या पाच वर्षांत यंदा प्रथमच मॉन्सूनने २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून मुक्काम हलविला आहे. २ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण देशभरात पोचलेल्या मॉन्सूनने वायव्य भारतात यंदा २ महिने १८ दिवस मुक्काम केला आहे.
मॉन्सूनची वायव्य भारतातील परतीची सुरूवात
वर्ष---परतीचा तारीख
२०१८---२९ सप्टेंबर
२०१९---९ ऑक्टोबर
२०२०---२८ सप्टेंबर
२०२१---६ ऑक्टोबर
२०२२---२० सप्टेंबर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.