
पुणे : जिल्ह्यातील बहुतांश भागासह आंबेगाव तालुक्यात आंब्याची झाडे मोहोराने (mango Blossom) बहरली आहेत. त्यामुळे यंदा या भागात आंब्यांच्या उत्पादनात (Mango Production) वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे, असा सल्ला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
आंबेगाव तालुक्यात घोडेगावपासून पश्चिमेला रायवळ आंब्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात विशेषतः भीमाशंकरच्या पट्ट्यात आंबा मोहोराने चांगलाच बहरलेला दिसून येत आहे. मात्र, मोहोर गळू नये म्हणून आंब्याच्या झाडांची खबरदारी घेण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मोहोराला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागांच्या वतीने देण्यात आला आहे.
त्याचबरोबर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुक्यात सुमारे ४५० हेक्टर आंब्याची लागवड आहे. त्यातही रायवळ आणि केशर जातीच्या आंब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मागील दोन वर्षांत रोगाचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहोराचे प्रमाण कमी झाल्याने आंबा उत्पादनात घट झाली होती.
चालू वर्षात अखेरपर्यंत चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने आंब्याच्या झाडांची वाढही चांगली झाली आहे. मोहोर चांगला भरल्याने यंदा उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे.
आंबेगाव तालुक्यात सध्या आंब्याच्या सर्वच झाडांना मोहोर चांगला असला तरी लहान फळे येण्यास अद्याप वेळ आहे. मात्र, या मोहोराला कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
- सचिन जाधव, कृषी सहायक, आंबेगाव.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.