
Nashik News : जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत शनिवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह इतरांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की १ जूनला गोदावरी नदीवर रामतीर्थावर कर्जाच्या नोटिसा बुडवून, प्रशासनाला निवेदन देऊन गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन, उपोषण सुरू केले आहे. ३८ दिवस उलटूनही दाखल न घेतल्याने येत्या २० जुलैपासून शेतकरी अन्न त्याग आंदोलन सुरू करणार आहोत.
तत्पूर्वी मागण्यांचा विचार होताना त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून केलेली आहे. दरम्यान शनिवारी (ता. १५) शासन आपल्या दारी उपक्रम जिल्ह्यात आयोजित केलेले असताना, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देत व आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविला.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला भेट देताना निवेदनाची प्रत सुपूर्द केली. शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, दत्तात्रेय सुडके, देवा वाघे, अनंत पाटील, नंदकुमार देवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.