
Latur News : तालुक्यात खरिपात विविध तणनाशकांची फवारणी करूनही सोयाबीनमध्ये कुरडू नामक तणाने थैमान घातले असून वाढत असलेल्या तणांनी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. मजूर लावून ते उपटून काढण्याचे आगाऊ खर्चिक काम लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अगोदरच पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, त्यात काही ठिकाणी पापडी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मागील महिन्यात विविध प्रकारच्या तणनाशकांच्या फवारण्या करूनही कुरडू तण नष्ट झाले नाही. उलट ते तेजदार झाल्याने सोयाबीनचे विपरीत परिणाम करणारे ठरत आहे.
ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. इतर तणही चांगलेच फुलत आहे. काही ठिकाणी फुले लागल्याने राने पांढरीशुभ्र होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी खरिपातील पिकात वाढलेले तण काढता काढता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. तणनाशक तयार करणाऱ्या कंपन्याची चौकशी करण्याची मागणी आहे.
अनेक ठिकाणी तर कुरडूचे प्रमाण आणखी वाढले तर सोयाबीन काढायचे कसे हा प्रश्न निर्माण होणार आहे. यावर्षी अनेक ठिकाणी तणनाशकांची फवारणी करूनही म्हणावा तसा त्याचा उपयोग झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाने याबाबतीत शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य त्या कंपनीचे तणनाशके वापरण्याविषयीचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कारण मोठा खर्च करूनही तण नष्ट न झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.