
डॉ. संजय काकडे
Cotton Crop Management : या वर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे खरीप हंगामाची सुरवात उशिरा झाली. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पेरणीस सुरुवात झाली. कपाशीच्या पेरण्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण झाल्या. त्यामुळे सध्या बागायती आणि कोरडवाहू जमिनीतील बीटी आणि अन्य वाण वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत आहेत. कापूस पिकांमध्ये सध्या आंतर मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. ही कामे वेळेवर केली तरी पीक वाढीसाठी मोठा फायदा होतो. पीक उगवणीनंतर पहिल्या आठवड्यात खाडे किंवा नांगे भरण्याचे काम बऱ्यापैकी आटोपले असेल. उशिरा पेरणी झालेल्या कापूस पिकात विरळणीची कामे उरकून घ्यावीत. त्यानंतर वरखताची मात्रा देणे, डवरणी व खुरपणीद्वारे तणांचे व्यवस्थापन करण्याला प्राधान्य द्यावे.
कापूस पिकात आंतरमशागतीचे प्रमुख फायदे ः
- तण नियंत्रण
-जमिनीची पाणी धारण क्षमता वाढविणे.
-जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवणे.
-जमिनीला पडलेल्या भेगा बुजविणे.
-जमिनीचा पृष्ठभाग कडक झाल्यास तो मोकळा करणे.
-जमिनीतील हवेचे प्रमाण संतुलित ठेवणे.
-जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या व त्याची कार्यक्षमता वाढवणे.
-प्रति हेक्टरी झाडांची अपेक्षित संख्या ठेवणे इत्यादी.
कापूस पिकामध्ये हेक्टरी झाडांची संख्या निर्धारित संख्येच्या जवळपास असावी. दोन ओळीतील अंतर व दोन झाडांतील अंतरावरच हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असते. रिकाम्या जागेत तणे फार जोमाने वाढतात, त्यामुळे खाडे लवकरात लवकर भरावेत. पीक फार दाट असल्यास पिकाच्या जवळच्या रोपांमध्येच स्पर्धा सुरू होते. ती टाळण्यासाठी आधीच विरळणीचे काम उरकून घ्यावे. तसेच पिकांच्या दोन ओळीतील अंतर कमी केल्यास तण नियंत्रण पातळीत वाढ होते.
बहुतांश (९०-९५ टक्के ) शेतकरी कोरडवाहू परिस्थितीत कमी कालावधीच्या बीटी कपाशीची लागवड करतात. कमी कालावधीच्या वाणांमध्ये आंतरमशागतीची कामे ही प्राधान्याने व वेळेवर करणे महत्त्वाचे असते. आतापर्यंत राज्यातील बहुतेक भागात चांगला पाऊस झाला असून, कापूस पिकाची उगवणही समाधानकारक आहे.
कापूस-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी
कापसाच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक-तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय घट येते. या कालावधीनंतर पिकातील तण काढूनही उत्पादनातील होणारी घट भरून निघत नाही. म्हणून पिकांच्या संवेदनक्षम कालावधीनुसार योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीने तण नियंत्रण करणे आवश्यक असते. कापूस पिकात हा स्पर्धेचा कालावधी २० - ७० दिवसांपर्यंत असतो. या कालावधीत पीक तणमुक्त ठेवल्यास तणासोबत होणारी स्पर्धा टाळता येते.
आंतर मशागत व तण व्यवस्थापन
कपाशीचे पीक पहिले ९-१० आठवडे तण विरहित ठेवणे जास्त आवश्यक असते. त्याकरिता बियाणे उगवणीनंतर १० ते २० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा डवरणी करावी. आवश्यकतेनुसार २-३ वेळा निंदणी करावी. खुरपणी व निंदणी ही शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असले तरी गेल्या काही वर्षामध्ये मजुरांची उपलब्धता कमी होत गेल्यामुळे निंदणी त्रासदायक, वेळखाऊ व खर्चिक ठरू लागली आहे. म्हणून आपल्या जमिनीचा प्रकार, मजुरांची उपलब्धता व मजुरीचे दर अशा बाबींचा विचार करून खुरपणीच्या कामाचे योग्य नियोजन करावे. उदा. लाल मातीच्या जमिनी लवकर कडक होतात. म्हणून त्यात काळ्या जमिनीच्या तुलनेत अधिक मजूर लागतात. विविध पिकांचा कालावधी, पीक व तण स्पर्धेचा कालावधी व पिकांचा प्रकार यानुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
पिकातील दोन ओळीतील अंतर जास्त असल्यास पिकामध्ये डवरणीचे काम खोल व दीर्घकाळ करणे शक्य होते. मात्र शेतात हरळी, लव्हाळा या सारखी तणे असल्यास डवरणीचे काम नीट करता येत नाही. विशेषतः वार्षिक तणांच्या नियंत्रणात अडचणी येतात. म्हणून या बहुवार्षिक तणांचे योग्य वेळी नियंत्रण करावे. तणे एक व दोन पाणी असताना डवरणी करावी. कारण अशा वेळी तणांच्या बियातील अन्नद्रव्यांचा साठा संपलेला असतो. मशागतीस लवकर बळी पडतात. तणे उंच वाढल्यास त्याच्या फांद्या, खोड यांच्या तुटलेल्या अवशेषामधूनही त्याची नवीन रोपे तयार होऊ शकतात. ( उदा. विंचू, उंदीरकाणी व हरळी इ. ) डवरणी करताना फार खोल करू नये, अन्यथा पिकांच्या मुळांना इजा पोहचू शकते. तसेच पीक उंच झाल्यावर डवरणी केल्यास फांद्या तुटून नुकसान होते. डवरणी करतेवेळी जमिनीत योग्य ओलावा असताना व पीक वाढीची अवस्था लक्षात घेऊन करावे. जमीन कडक असल्यास डवऱ्याला दातेरी पास लावावी. डवरणीमुळे पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेत हवा खेळती राहते. त्याचा पीक उत्पादनावर अनुकूल परिणाम होतो.
उगवण पश्चात तणनाशकांचा वापर :
कापूस हे जास्त कालावधीचे पीक आहे. मजुरांची उपलब्धता नसणे आणि सततचा पाऊस अशा काही कारणांमुळे खुरपणी व डवरणीसारखी कामे करणे शक्य होत नाही. अशा वेळी कापूस पिकात विविध उगवणपश्चात तणनाशकांचा वापर करता येईल. मात्र तणनाशकाच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पंप व योग्य तो नोझल वापरावा. तणनाशकही शिफारशीप्रमाणेच योग्य मात्रेमध्ये, योग्य वेळेमध्ये वापरावे. पूर्ण संवेदनशील कालावधीत तणे नियंत्रणात राहण्यासाठी डवरणी, निंदणी व अन्य मशागतीचे नियोजन करावे. (तक्ता पहा.)
तक्ता ः कापूस पिकासाठी शिफारशीत तणनाशके व उभ्या पिकातील त्यांचे योग्य प्रमाण ः
अ.क्र. --- तण नाशकाचे सामान्य नाव --- मात्रा कि./लि. प्रति/हे. --- व्यापारी घटक (मात्रा प्रति १० लिटर पाणी) --- केव्हा व कसे वापरावे
१. --- पायरीथायोबॅक सोडिअम (१०% ई.सी.) --- ०.६२५-०.७५० लिटर --- १२.५-१५ मि.लि. --- उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसाचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
२. --- पायरीथायोबॅक सोडिअम (६% ईसी) अधिक क्विझालोफोप इथील (४% ई.सी.)(संयुक्त तणनाशक) --- १.०-१.२५ लिटर --- २०-२५ मि.लि. --- उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसाचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
३. --- क्विझालोफोप इथाईल (५% ई.सी.) --- १.० लिटर --- २० मि.लि. --- उगवणपश्चात, उभ्या पिकांत तृणवर्गीय तणे असल्यास पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात स्प्रेडर (प्रसारक द्रव्ये) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे.
४. --- फिनोक्साप्रॉफ इथील (९.३% डब्लू./डब्लू./ई.सी.) --- ७५० मि.लि. --- १५ मि.लि. --- उगवणपश्चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास पीक ३०-४० दिवसाचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात स्प्रेडर (प्रसारक द्रव्ये) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे.
५. --- ग्लुफोसिनेट अमोनिअम (१३.५% एस.एल.) --- २.५-३.० --- ५०-६० मि.लि. --- उगवणपश्चात, संरक्षित कवच (हूड) लावून कपाशीच्या दोन ओळीच्या मधील तणावर गरजेनुसार फवारणी करावी. तणनाशक कपाशी पिकावर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करावी. फवारणीनंतर ५-६ तासांत पाऊस पडणार नाही, हा अंदाज घेऊनच फवारणी करावी.
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
रासायनिक तणनाशके वापरण्याचा पूर्वानुभव नसल्यास तांत्रिक सल्ला घेऊनच फवारणीचे नियोजन करावे.
- तणनाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे. तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसार फवारावे.
- ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये. फवारणीकरिता स्वच्छ पाणी वापरावे. कडक उन्हात उगवणपश्चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
- फवारणी करताना तणनाशकाचे द्रावण अधून मधून ढवळावे.
- कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणीसाठी शक्य झाल्यास वेगळा पंप ठेवावा. वेगळा पंप शक्य नसल्यास तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण पंप साबणाच्या पाण्याने २-३ वेळा व नंतर साध्या पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावा. म्हणजे त्यात तणनाशकचे अंश शिल्लक राहणार नाही. ज्या पंपाद्वारे २,४-डी या तणनाशकाची फवारणी इतर तृणवर्गीय पिकात केली असल्यास तो पंप कपाशीमध्ये तणनाशकाची फवारणी करण्यास वापरू नये.
-फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. त्यामुळे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल.
- तणनाशक फवारताना त्याचा फवारा इतर (स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतातील) पिकांवर उडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- २,४-डी तणनाशकाचा फवारा चुकीने कपाशी पिकावर उडून दुष्परिणाम झाल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करावी. नवीन फूट चांगली येण्यासाठी युरिया १ टक्का (एक किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी ) फवारणी करावी.
डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०
(कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.