Konkan Mango Season : कोकण हापूस हंगाम अंतिम टप्प्यात
Mango Market Update : हवामान बदलांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आणखी ८ दिवस आवक सुरू राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर गावरान आंब्याच्या आवकेची आतुरता ग्राहकांसह व्यापाऱ्यांना लागली आहे.
यंदा कोकण हापूसचा हंगाम सुरुवातीपासूनच हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकला होता.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने मोहर झडला, नंतर मोहराच्या पोषक वातावरणासाठी कडाक्याच्या थंडीची वानवा, वाढलेले तापमान, फळधारणेच्या अवस्थेतील अवकाळी पाऊस आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहर न लागल्याने घटलेले उत्पादन आदी विविध कारणांनी या वर्षी आंब्याची टंचाई निर्माण झाली होती.
तर केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन मिळाल्याचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे यंदा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाच नसल्याचे चित्र आहे.
कोकण आंब्याच्या हंगामाबाबत पुणे बाजार समितीमधील अडते असोसिएशनचे सचिव आणि कोकण हापूसचे अडतदार करण जाधव म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांनतर यंदा आंब्याचा हंगाम हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकला होता.
आंबा हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस, थंडीची कमतरता, थंडीचे कमी झालेले दिवस, वाढलेले तापमान आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहर न लागल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले होते.
यामुळे आगाप हंगामात फेब्रुवारी-मार्चमध्ये दर चांगले मिळाले. मात्र या काळात आवक कमी होती. तर चोखंदळ ग्राहकांमुळे दर चांगले मिळाले.
मात्र अक्षय तृतीयेला ज्याप्रमाणात आंबा उपलब्ध व्हायला पाहिजे होता, त्याप्रमाणात उपलब्ध न झाल्याने आंब्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने दरदेखील ८०० ते १२०० रुपये प्रति डझन इतके होते.
हेच दर साधारण ५०० रुपयांपर्यंत असतात. ते एवढे कमी झालेच नाहीत. यामुळे या वर्षी आंबाटंचाईमध्येच हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.’’
दरम्यान, आता कोकण हापूसचा हंगाम संपत आला असून, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, या पश्चिम घाट परिसरातील गावरान हापूसच्या हंगामाची आतुरता लागली आहे.
सध्या तुरळक आवक सुरू झाली असली, तरी मेअखेर या आंब्याची आवक होण्याची शक्यता गावरान आंब्याचे प्रमुख अडतदार तात्या कोंडे यांनी सांगितले. गावरान हापूसवर देखील अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याने त्याचे दर देखील चढेच राहण्याची शक्यता आहे.
कर्नाटक आंब्याला मागणी वाढली
कोकण हापूसच्या टंचाईमुळे ग्राहक कर्नाटक आंबा खरेदीकडे वळाल्याचे प्रमुख विक्रेते रोहन उरसळ यांनी सांगितले. कर्नाटक हापूस बरोबर पायरी आंब्याला मागणी वाढली होती. सध्या कर्नाटकमधून १० ते १५ हजार पेट्या करंड्यांची आवक होत असून, कर्नाटक हापूसचे ३०० ते ५०० रुपये डझन, पायरीला २५० ते ५०० रुपये डझन दर आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.